‘पोकरा’च्या 327 गावांसाठी 130.88 कोटींचा आराखडा मंजूर-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या सनियंत्रण समितीची बैठक

औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेंतर्गत जिल्ह्यातील 327 गावच्या 130.88 कोटींच्या मृद व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रीय आराखड्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज मंजुरी दिली.

Displaying 5.pokhara metting.JPG

जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा) योजनेसंदर्भात जिल्हा सनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  तथा आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.आर. देशमुख, जिल्हा पशुसंर्वधन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड आदींसह कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. 

               जिल्ह्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील 327 गावांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील 45, पैठण 53, फुलंब्री 24, वैजापूर 54, गंगापूर 35, खुलताबाद 11, सिल्लोड 30, सोयगाव 22 आणि कन्नड तालुक्यातील 53 गावांचा समावेश आहे. कृषी विभाग आणि ग्राम संजिवनी समितीच्या समन्वयाने जल व मृद संधारणातील कामांबाबतचे आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. जल व मृद संधारण कामांमध्ये सिमेंट नालाबांध, कंपोजिट गॅबीयन, कंपार्टमेंट बंडिंग, नाला खोलीकरण, अनघड दगडी बांध, समतल चर, माती नाला बांध आदी कामांचा समावेश असल्याचे डॉ. मोटे यांनी जिल्हाधिकारी यांना यावेळी माहिती दिली.

               पोकरा योजनेंतर्गत सिल्लोड, वैजापूर आणि औरंगाबादच्या उपविभागनिहाय लाभांबाबतची सद्यस्थितीची माहिती सादर करण्यात आली.  यामध्ये वैयक्तिक लाभाचे घटक, तालुकानिहाय वितरीत अनुदान, कृषी विकास घटकाचा प्रगती अहवाल, सुक्ष्म नियोजन प्रक्रिया आदींचाही समावेश होता.