औरंगाबाद शहरात १०जुलै ते १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन
औरंगाबाद :कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. हा लॉकडाऊन १० ते १८ जुलै दरम्यान असणार आहे. जिल्हा प्रशासन याला जनता कर्फ्यू असे म्हणत आहे. या काळात उद्दोग व व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे .
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य व पोलीस यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु कारोनाची साखळी तोडण्यासाठी स्वत: नागरिकांनी देखील जबाबदारीने व दक्षतेने वागणे आवश्यक आहे. कोरोना मुक्तीसाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, महत्त्वाचे म्हणजे गर्दी टाळणे या नियमांचे पालन करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले. नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे खूप गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्याकरीता सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ उपचार घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. विनाकारण रस्त्यावर कुणीही फिरु नये. स्वत: लोकांनीच लॉकडाऊन पाळला तर कोरोनाला आपण निश्चितपणे हरवू शकतो.