अनाथ लेकरांची आई हरपली, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन
पुणे,४ जानेवारी /प्रतिनिधी :- आपल्या सामाजिक कार्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव जागतिक पातळीवर गाजविणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.अनेक संघर्षांना सामोरं जात सिंधूताई यांनी हजारो अनाथ बालकांचं पालकत्व स्विकारलं होतं. दरम्यान, वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या सिंधूताईंच्या निधनानं हजारो लेकरं पोरकी झाली आहे.
चिमुकल्यांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या उज्जव भविष्याची जबाबदारी सिंधुताईंनी आपल्या खांद्यावर घेतली होती. अनेक वर्ष अविरतपणे त्यांनी हे काम प्रामाणिकपणे आणि मन लावून केलं.
आपल्या संस्थेच्या माध्यमातून हजारपेक्षा जास्त बालकांना त्यांनी लहानाचं मोठं केलं. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अनाथ बालकांची जबाबदारी सिंधुताईंनी आपल्या खांद्यावर सक्षमपणे पेलली.
संपूर्ण जगभरात सिंधूताईंच्या कामाची दखल घेण्यात आली असून अनेक मुलाखतींमधून त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांचं काम याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांच्यावर आधारीत एक मराठी सिनेमाही प्रकाशित झाला होता. तेजस्विनी पंडीत यांनी या सिनेमात सिंधूताईंची भूमिका वटवली होती.
सिंधूताईंनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्ष केले. अत्यंत खडतर प्रवास केला. सर्व कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला.घराला वंशाचा दिवा हवा असताना मुलगी जन्माला आली म्हणून सिंधूताई यांचं नाव चिंधी ठेवण्यात आलं होतं, असं त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं.
गाव लहान असल्याने सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे सिंधुताई यांचं फक्त इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालं. मात्र त्यानंतर त्यांचा व्यासंग इतका होता, की सुरेश भटांच्या अनेक गझला त्यांना तोंडपाठ होत्या. अनेक कविताही त्यांना पाठ होता.
नेहमी हसतखेळत असणाऱ्या, आनंदाचा निखळ झरा ज्यांच्या डोळ्यातून वाहत असायचा, त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी पुन्हा कधीच भरुन येणार नसल्याची खंत अनेकांच्या मनात आहे.
सिंधुताई यांना प्रकृती अस्वाथामुळे २४ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ नोव्हेंबरला शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत कमी अधिक सुधारणा होत होती. त्यांनतर गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
पुण्यातील मांजरी येथे सकाळी ८ वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. महानुभाव पंथाच्या त्या अनुयायी असल्याने दुपारी १२ वाजता ठोसर बागेत दफनविधी करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली.
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण गावात ममता बाल सदन संस्था सुरु केली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.
सिंधूताई यांचं समाजकार्याची जगभरात दखल घेतली गेलीय. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप खडतर प्रवास केला. सर्व खडतर प्रसंगांना तोंड देत त्यांनी हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला.
खरंतर सिंधुताई यांचा खडतर प्रवास हा त्यांच्या जन्मापासूनच सुरु झाला होता. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला होता. घराला कुलदीपक हवा असताना मुलगी जन्माला आली म्हणून सिंधूताई यांचं नाव चिंधी ठेवण्यात आलं होतं. गावा लहान असल्याने सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे सिंधुताई यांचं फक्त इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालं होतं. तसेच वयाच्या 9 व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेले श्रीहरी सपकाळ यांच्याशी विवाह झाला होता. अनेक संघर्षांना सामोरं जात त्यांनी हजारो अनाथ बालकांचं पालकत्व स्विकारलं होतं.
सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते उज्ज्वल भविष्याची जबाबदारी घेतली. त्यादिशेने त्यांनी अनेक वर्ष काम केलं. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून हजारपेक्षा जास्त बालकांचं पालकत्व निभावलं. त्याचबरोबर त्यांनी अशा अनेक संस्थांमधून अनाथ बालकांची जबाबदारी खांद्यावर घेतली.
सिंधुताई यांनी स्थापन केलेल्या समकक्ष संस्था
बाल निकेतन हडपसर, पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
अभिमान बाल भवन, वर्धा
गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
ममता बाल सदन, सासवड
सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
सिंधुताईंना मिळालेले पुरस्कार
– पद्मश्री पुरस्कार (२०२१)
– महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)
– पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (२०१२)
– महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (२०१०)
– मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
– आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)
– सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
– राजाई पुरस्कार
– शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
– सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे दिला जाणारा ‘सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (१९९२)
– सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार’ (२०१२).
– २००८ – दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’.
– प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)
– डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)
– पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’