सिल्लोड येथील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

औरंगाबाद,३० डिसेंबर /प्रतिनिधी:- सिल्लोड तालुक्यातील भराडी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला. भराडी रोडवर ऊसाचे ट्रॅक्टर रस्त्याचे कडेला नादुरुस्त अवस्थेत उभे होते. यावर छोटा टेम्पो आदळून हा अपघात झाला.

सिल्लोड येथील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

 वाहनांचे नुकसान 

या अपघातामध्ये वाहनाचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पिकअपचा समोरी भाग पूर्णपणे डॅमेज झाला आहे. तर ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसल्याने ट्रॅक्टरचा मागचा भाग चकनाचूर झाला आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

या भीषण अपघातात, जिजाबाई गणपत खेळवणे (वय ६० वर्ष), संजय संपत खेळवणे (वय ४२ वर्ष), संगीता रतन खेळवणे (वय ३५ वर्ष), लक्ष्मीबाई अशोक खेळवणे (वय ४५ वर्ष), अशोक संपत खेळवणे (वय ५२ वर्ष), रंजनाबाई संजय खेळवणे (वय ४० वर्ष) सर्व रा. मंगरूळ या सर्वांचा जागेवरच मृत्यु झाला आहे.

अपघातात गंभीर जखमींची नावे: कासाबाई भास्कर खेळवणे (वय ४० वर्ष), अजिनाथ शेषराव खेळवणे वय ४५, आकाश रमेश बोर्डे (वय १८), ऋषिकेश गोविंदराव आरके (वय २०), संतोष गणपत खेळवणे (वय३०), धुलाबाई नारायण बोर्डे (वय ५०), दुर्गाबाई दत्तात्रय खेळवणे (वय ४५), सुलोचना आत्माराम खेळवणे (वय ५५), गणेश सुखदेव बोर्डे (वय १९ वर्ष) सर्व रा. मंगरूळ हे ९ प्रवाशी गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. तर सार्थक अजिनाथ खेळवणे (वय ८ वर्ष), ओमकार रतन खेळवणे (वय १६), कलाबाई बाबू म्हस्के (वय ५० वर्ष), सुभाष राजेश खेळवणे (वय ४५), सुरेश विठल खेळवणे (वय ५० वर्ष) या पाच लोकांवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.