स्पेशल रिकव्हरी रुम सुरू करण्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे निर्देश
जिल्हाधिकारी यांनी घेतला कोविड केअर सेंटरचा आढावा
औरंगाबाद दि.5: जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज शहरातील पद्मपुरा येथील Emergency Operation Center, एमआयटी येथील कोविड केअर सेंटर आणि कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज संस्थेच्या आयुर्वेदीक कॉलेज येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन तिन्ही ठिकाणच्या सोयीसुविधांची पाहणी करुन तेथील रुग्णांशी, डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले. तसेच रुग्णांचे म्हणणे ऐकून त्यांच्या सुचनांप्रमाणे डॉक्टरांशी समन्वय करुन त्याच ठिकाणी त्यांच्या सुचनांचे निरसन केले. तसेच तिथे देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबाबत आणि अधिकारी, कर्मचारी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.
त्यांनी प्रथम पद्मपुरा येथील Emergency Operation Center ला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचांरी यांच्याशी संवाद साधला. तसेच दाखल कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधला. तेथील पुर्ण परिसर आणि व्यवस्थेची पाहणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. रुग्ण,डॉक्टर तसेच इतर कर्मचारी यांचा भाग स्वतंत्र ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश देत तेथील सर्व यंत्रणा उत्तमरित्या काम करत असून घेण्यात येणाऱ्या काळजीबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याठिकाणी 41 रुग्ण उपचार घेत असून 70 खाटांची क्षमता या सेंटरमध्ये आहे. यावेळी रुग्णांशी संवाद साधताना अनेक रुग्णांनी येथील व्यवस्था आणि पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांविषयी समाधान व्यक्त केले.
एमआयटी कॉलेज हॉस्टेल येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, फॅसिलेटी इंचार्ज यांच्यासह येथील विविध मजल्यावरील रुग्णांशीही जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला. याठिकाणी 221 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची घेण्यात येणाऱ्या उत्तम देखभालीबद्दल अनेक रुग्ण यावेळी भावनिक झाले होते. येथे दाखल असणाऱ्या कुटुंबांसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. . यावेळी येथील सफाई कर्मचारी काम करत असताना त्यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘येथील कर्मचारी गेल्या 2 महिन्यांपासून सातत्याने कार्यरत असून ते इतरांसोबतच स्वत:ची देखील अत्यंत काळजी घेत आहेत. या रुग्णांची काळजी घेत असणाऱ्या इथल्या डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी यांच्यावर कोणताही ताण-तणाव दिसला नाही उलट इथे सर्वांमध्ये दिसणारा उत्साह पाहून मला आनंद झाला असल्याचे सांगुण जिल्हाधिकारी म्हणाले की, जर कोविड सेंटरममध्ये भरती असणाऱ्या एखाद्या रुग्णाचा ऑक्सिजन कमी झाला असेल आणि त्याला पुढील उपचारासाठी भरती करेपर्यंत रुग्णाला तात्पुरत्या स्वरुपात रिकव्हरी रुममध्ये ऑक्सिजन देऊन स्थिर केल्या जाते. अशा प्रकारची स्पेशल रिकव्हरी रुम इतर कोविड केअर सेंटरमध्ये सुरू करण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना निर्देश दिले. इथे उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 9 दिवस उपचार घेणारे रुग्ण घरी जाण्यासाठी उत्सुक होते पण त्यांनी मला आवर्जुन सांगितले की, मागचे 9 दिवस येथे आमची उत्तम काळजी घेण्यात आली. आम्ही इतर पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना देखील उपचारासाठी एमआयटी कॉलेजमध्येच येण्याचे आवर्जुन सांगू असे सांगुण जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की याठिकाणी गाणी ऐकण्याच्या मनोरंजानाच्या सुविधेमुळे रुग्णांना थोडा विरंगुळा मिळत असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
एमआयटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज संस्थेच्या आयुर्वेदीक कॉलेजच्या पंचकर्म विभागाच्या इमारतीध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या कोविड सेंटरला भेट दिली. या सेंटरमध्ये 71 रुग्णांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नवीनच सुरू झालेल्या या कोविड सेंटरमधील आयुर्वेदीक महाविद्यालयातील डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधुन एमआयटी कॉलेजचे अनुभव सांगुन त्यांचे मनोबल वाढविले त्यांनी या कार्यांत प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला बंदींशी संवाद: जाणुन घेतल्या समस्या
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात राबविण्यात येत असलेल्या कोरोनाप्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात जेणेकरुन कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे सांगितले.
हर्सूल कारागृहातील कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी आढावा घेऊन आवश्यक त्या सुचना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज अचानक कारागृहाला भेट दिली. यावेळी कारागृह अधिक्षक हिरालाल जाधव, डॉक्टर्स आणि इतर अधिकारी उपस्थित होते. सर्व प्रथम जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना कारागृहात योग्य प्रकारे अमलात आणल्या जात आहेत. प्रत्येक कैद्यांची नियमितपणे ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान मोजणे तसेच रोज सर्वांची स्क्रिनिंग करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या त्या सूचनांचे तंतोतंत पालन कारागृह प्रशासनाकडून होत आहे. कोविड व्यतिरिक्त आजारांवर देखील तात्काळ उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. यापूर्वी बाहेरुन येणाऱ्या भाजीपाला, फळांच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा कारागृहात शिरकाव झाला असेल तर अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला दिले आणि त्या संबंधित योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याचे आढळुन आल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी 60 वर्षांवरील बंदीवानांसाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कक्षाला भेट देऊन त्यांच्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘ हे वयोवृध्द बंदी आरोग्याच्या दृष्टिने ठणठणीत असल्याचे आढळले. बंदींनी आरोग्याच्या समस्यांशिवाय त्यांच्या काही वयक्तिक समस्या मांडल्या ज्यामध्ये प्रामुख्याने अपील संबंधित, वकील लावण्यासंबंधित, घरच्यांशी जास्त वेळ बोलू द्यावे अशा समस्यांचा समावेश होता. ह्या समस्या सोडविण्यासाठी योग्य ते निर्देश कारागृह प्रशासनाला दिले. प्रत्येक बॅरेकमध्ये कैद्यांचे नियोजन व्यवस्थितपणे करावे,ते एकत्र येणार नाही ही दक्षता घ्यावी, बाहेरच्या व्यक्तीशी संपर्क होऊ न देणे असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
कोविडमुक्त झालेल्या बंदिंसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ह्या सर्व बंदींना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या बंदींशी देखील संवाद साधला. तसेच कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशीही जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.