विधानपरिषदेत निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप

मुंबई,२७ डिसेंबर /प्रतिनिधी:-विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत असलेल्या विधानपरिषदेतील सदस्य सर्वश्री रामदास कदम, अमरीश पटेल, सतेज पाटील, अशोक उर्फ भाई जगताप, गोपिकिशन बाजोरिया, अरुणकाका जगताप, प्रशांत परिचारक, गिरिशचंद्र व्यास, यांना विधानपरिषदेत निरोप देण्यात आला.

विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, रामदास कदम यांची राजकीय कारर्कीर्द पाहताना कोकणातील जनतेविषयी त्यांना असलेले प्रेम दिसले. कोकणातील जनतेची कामे त्यांनी जबाबदारीने पार पाडली. पक्षाने दिलेली जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

सदस्य भाई जगताप एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाते. तसेच प्रत्येक विषयावर त्यांची भूमिका ते ठामपणे मांडतात.

गिरिशचंद्र व्यास हे ध्येयनिष्ठ व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. सभागृहाची परंपरा, संस्कृती जपत सर्वांनी आपले कर्तव्य बजावले आहे. त्यांचा वैचारिक ठेवा त्यांनी या सभागृहाला दिला आहे, असेही श्री.निंबाळकर यांनी सांगितले.

विधान परिषद सभागृहात येणारा प्रत्येक सदस्य या सभागृहासोबत एकरुप होऊन जातो. परस्परांमध्ये आपोआप स्नेहसंबंध निर्माण होतात. राजकारणापलिकडे जाऊन एक माणूस म्हणून आपली ओळख निर्माण होते. अशी या सभागृहाची वैशिष्ट्ये आहेत, असेही ते म्हणाले.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, रामदास कदम हे कोकणातील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाते. सभागृहात अनेक भाषणामधून त्यांनी कोकणातील जनता, आदिवासी समाज याविषयी विविध प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला. सामान्य जनतेच्या मनात त्यांचे स्थान ध्रुव ताऱ्यासारखे अढळ असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सदस्य भाई जगताप त्यांनी कामगारांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न, हक्कभंगचे प्रश्न प्राधान्याने सभागृहात मांडले. महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या समस्या व  प्रश्नावर त्यांनी प्रकाशझोत टाकला.

यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी राजकारणात आणि समाजकारणात तसेच सभागृहात केलेल्या कामकाजाला यावेळी उजाळा देण्यात आला.