“सरकार घाबरलेलं,आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे इतिहासातील पहिलं सरकार’, विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेवरुन फडणवीसांचा घणाघात

मुंबई,२२ डिसेंबर /प्रतिनिधी:- राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुनही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली.

May be an image of 8 people and people standing

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही यावेळी आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला आहे. पण याच निर्णयावर विरोधी पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. फडणवीस यांनी याच निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकार 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करते. पण आपल्या आमदारांवरच विश्वास नसलेलं हे सरकार आहे, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

सरकारवर हल्लाबोल चढवताना फडणवीस म्हणाले की, ‘अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जो प्रस्ताव आज मांडण्यात आला त्यातून हे सरकार किती असुरक्षित आहे हे लक्षात आलं. 60 वर्षापर्यंत अध्यक्षांची निवडणूक गुप्त पद्धतीने झाली. अगदी जेव्हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये फक्त 5 – 7 मतांचा फरक होता तेव्हाही ही निवडणूक गुप्त पद्धतीने झाली. पण 170 आमदार आमच्याकडे आहेत असं सांगणाऱ्या महाविकास आघाडीला ओपन पद्धतीनं ही निवडणूक घेण्याची नामुष्की ओढावली. कारण त्यांच्यातील असंतोष इतका भयानक आहे की त्यांना खात्री आहे की त्यांचे आमदार हा असंतोष अध्यक्षांच्या निवडणुकीत व्यक्त करतील आणि त्यांच्यावर नामुष्की ओढावले. म्हणून त्यांनी नियम बदलाचा घाट घातला’.अशी टीका फडणवीसांनी केली.

Image

“याचं कारण त्यांच्यातील जो असंतोष आहे. हा असंतोष इतका भयानक आहे की त्यांना खात्री आहे गुप्त मतदान पद्धतीने केलं तर त्यांचे आमदार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत असंतोष व्यक्त करतील. त्यांच्यावर नामुष्की येईल. म्हणून त्यांनी नियम बदलण्याचा घाट घातला आहे. हे करत असताना इतक्या घाईत हे सगळं करण्यात आलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.

या संदर्भात अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर यात पाहिलं तर आम्ही पोल मागत होतो, पण पोल देखील देण्यात आलेला नाही. आता हे घोडेबाजार आणि म्हणतात, मग साठ वर्षात घोडेबाजार नव्हता का. आणि कधीच झाला नाही. त्याच्यामुळे हे जे गोंडस नाव देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ते त्यांची असुरक्षितता, घाबरलेले सरकार आहे, आपल्या आमदारांवर विश्वास नसलेलं सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी बघितलं नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.

‘फक्त सावकारासारखी वसुली सुरु’

वीजेबाबतची लक्ष्यवेधी मांडली तेव्हा सर्वपक्षीय सदस्य सहमत होते. ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडली जात आहेत. डीपी काढून टाकले जात आहेत. पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तोडले जात आहेत. त्यावेळी राज्य सरकार पैसे देत नाही असं उत्तर नितीन राऊतांनी दिलं. त्यामुळे राज्य सरकारनं यावर उत्तर द्यावं अशी मागणी केली. तेव्हा ही लक्ष्यवेधी राखून ठेवण्यात आली. उद्याही आम्ही यावर आवाज उठवू. सरकार सांगतं की थकबाकी वाढली ते व्याजावर व्याज लावून सांगितलं जातं. हे राज्य सरकार एक नवा पैसा देत नाही. मात्र सावकारासारखी वसुली सुरु आहे. याचा विरोध आम्ही करत राहू, असा इशाराही त्यांनी दिलाय.

Image

‘राजा उजार झाला आणि हाती भोपळा दिला’

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा आम्ही लावून धरला. यावर सरकार पूर्णपणे उघडं पडलं. साडे अकरा हजार कोटीचं पॅकेज किती फसवं आहे हे त्यांनीच मान्य केलं. 25 आणि 50 हजाराची घोषणा करण्याऱ्या उद्धव ठाकरेंच्या काळात किती मदत झाली त्याची यादीच मी वाचून दाखवली. राजा उजार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी स्थिती आहे, असा टोला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. केंद्र सरकारकडून आलेले पैसेही हे सरकार वाटू शकलेलं नाही. हे आज आम्ही दाखवून दिलं आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे न देता त्यांना टाळल्यामुळे मोठा रोष आहे, असंही त्यांनी म्हटलंय.