विधानसभा प्रश्नोत्तरे:अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई,२२ डिसेंबर/प्रतिनिधी:- गेवराई तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या भरारी पथकाने एप्रिल ते  ऑक्टोबर या काळात 51 प्रकरणात 1 कोटी 21 लाख 79 हजार एवढी दंडात्मक कारवाई केल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत सांगितले.

कोविडचा समर्थपणे मुकाबला करीत असताना देखील महाराष्ट्रात विकासकामे वेगाने सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुरळेगांव येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्ष नेते विधानसभा सदस्य देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य लक्ष्मण पवार, भास्कर जाधव, आशिष जयस्वाल, सुनील  प्रभू यांनी  प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

श्री. थोरात म्हणाले की,  गोदावरी नदी पात्रातील जागेचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी तहसीलदार यांच्या समवेत पंचनामा केल्यानंतर वाळुमाफियांनी नियमांचे उल्लंघन करुन आधुनिक साधनांच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करुन नदी पात्रात दहा ते पंधरा फुटापर्यंत खड्डे केलेले नाही. नदीला पूर आल्याने 17 वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अवैध वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशाने आलेल्या एकूण 5 टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात जलसंपदा विभागाबरोबर समन्वयाने काम करण्यात येईल. तसेच वेगवेगळ्या राज्यभरात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 970 आरोपी अटक करण्यात आले असून 46 कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे. लवकरच खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष यांच्याशी सुध्दा या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल.

९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ईपीक पाहणी नोंदणी पूर्ण – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

महसूल आणि कृषी विभागाच्यार संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ई-पीक पाहणी ॲपवर 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी पूर्ण केल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत दिली.

राज्यातील ई-पीक पाहणी ॲपची सक्ती न करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य संग्राम धोपटे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी  प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

श्री. थोरात म्हणाले की,  ई-पीक पाहणी हे सहजता, पारदर्शकता आणि बिनचूकता यासाठी महत्त्वाचे असून हा प्रयोग देशपातळीवरही अवलंबला जाईल अशी खात्री आहे. ई – पीक पाहणी हा कार्यक्रम टाटा ट्रस्टच्या सहकार्याने 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभरात राबविण्यात येत आहे. या पीक पाहणीचा उपयोग महसूल विभागाबरोबरच कृषी, पणन आणि नियोजन विभागाला होणार आहे. एका ॲड्राईड फोनमधून साधारण 50 शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करण्यात येते त्यामुळे जेथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी नोंदणी करीत असताना विशेष काळजी घेण्यात येत आहे. याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांना काही अडचणींमुळे ई-पीक पाहणी करता आली नाही तर तलाठीस्तरावरुन पूर्वीप्रमाणे पीक पेऱ्याची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अचूक पिकांच्या नोंदी गाव नमुना 12 मध्ये होणे आवश्यक असल्याने शेतकरी यांनी स्वत: ई पीक पाहणीद्वारे पीक पेरा नोंदविणे शेतकरी हिताचे आहे. 6 जिल्ह्यांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने करण्यात आलेल्या पीक पाहणी सर्वेक्षण यशस्वी होते का याचा सुध्दा अभ्यास करण्यात येईल.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेंडगाव येथील आक्षेपित शेतीची पाहणी

व पंचनामे पूर्ण – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेंडगाव येथील शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलेल्या शेतीची पाहणी व पंचनामे संयुक्त पथकाद्वारे करण्यात आले असून विहित कालावधीत हे प्रकरण निकाली काढण्यात आले असल्याचेमहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील सुर्जी शेंडगाव येथील शेतकऱ्यांना तलाठी यांनी यादीतून वगळल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखडे, प्रकाश सोळंके, यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

महसूल मंत्री श्री.थोरात म्हणाले की, जून आणि जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती खरडून गेलेली असताना यादीत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच तलाठी यांनी वगळले ही बाब खरी नाही. याशिवाय ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची सर्वेक्षण पंचनामा यादी ग्रामपंचायत बोर्डावर प्रसिध्द केली होती. तसेच या यादीबाबत काही आक्षेप असल्यास 8 ऑगस्ट 2021 पर्यंत आक्षेप दाखल करण्याचे कळविले होते. तसेच 5 ऑगस्ट 2021 रोजी प्राप्त आक्षेपांबाबत संयुक्त पथकाने शेतीची पाहणी आणि पंचनामा करुन प्राप्त आक्षेप विहीत कालावधीत निकाली काढलेले आहेत.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा –कृषी  मंत्री दादाजी भुसे

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची नुकसान भरपाई भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत अदा करण्यात आल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य कुणाल पाटील, शिरीष चौधरी, किशोर पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

श्री. भुसे म्हणाले की, आंबिया बहार 2019-20 मध्ये केळी या फळपिकासाठी जळगाव जिल्ह्यातील 42 हजार 37 शेतकऱ्यांनी 54 हजार 354 हेक्टर क्षेत्राकरिता सहभाग नोंदविला होता. योजनेतील अटी- शर्ती आणि महावेध प्रकल्पामार्फत प्राप्त हवामानाच्या आकडेवारीनुसार 41 हजार 578 शेतकऱ्यांना 371.94 कोटी रुपये इतकी विमा नुकसान भरपाई भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत अदा करण्यात आली आहे.

बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन – फलोत्पादन मंत्री संदीपनराव भुमरे

 बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन करण्यात आल्याचे फलोत्पादन मंत्री संदीपनराव भुमरे यांनी आज विधानसभेत सांगितले.

सीताफळांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजना बाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य अमिन पटेल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

श्री. भुमरे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सीताफळांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन फळांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र सीताफळांच्या झाडावर त्याचा दुष्परिणाम झालेला नाही. 9 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या मार्गदर्शन सत्रात शेतकऱ्यांना या प्रश्नाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.