अजातशत्रू गणपतराव देशमुख यांचे विधान भवनात स्मारक उभारण्याबाबत शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,२२ डिसेंबर /प्रतिनिधी:- सलग ११ वेळा विधानसभेत सदस्य म्हणून निवडून येण्याचा दिवंगत सदस्य गणपतराव देशमुख यांचा विक्रम होता. त्यांच्या राजकीय, सामाजिक कार्यामुळेच हे शक्य होऊ शकले आहे. राजकारणाला नैतिक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या गणपतराव देशमुख यांच्या कार्याची ओळख पुढील पिढीपर्यंत पेाहोचणे गरजेचे आहे. विधानभवन येथे त्यांचे स्मारक उभारण्यास शासन सकारात्मक आहे.

गणपतराव देशमुख यांनी सहा दशकांहून अधिक काळ संसदीय राजकारणात आपला दबदबा कायम राखला. राज्याच्या राजकारणात त्यांची सात दशकांहून अधिकची वाटचाल होती. विधीमंडळात अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला.

दिवंगत देशमुख शेकापचे नेते, डाव्या विचारसरणीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते, मात्र ते सर्वपक्षीय नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे आदर्श होते.

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला त्यांनी सभ्य, सद्वर्तनी, सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिले. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचे काम केले. अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला. त्यांच्या निधनाने मुल्याधिष्ठित राजकारणी, आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचे स्मारक विधानभवन येथे उभारण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या सहमतीने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत सदस्य गणपतराव देशमुख यांचे विधानभवनात स्मारक उभारण्यासदंर्भात सूचना केली होती. यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहमती दर्शवली.