हजारो कोंटींचे घोटाळे कसे झाले?, रिझर्व्ह बॅंकेने केले का ?-सहकार मंत्री अमित शाह

सहकार चळवळ मोडण्यासाठी  नाही तर त्यात  भर घालण्यासाठी आलो आहे-शाह 
सहकारी चळवळीवर अन्याय होणार नाही-सहकार मंत्री अमित शाह 

प्रवरानगर (अहमदनगर ) ,१८ डिसेंबर/प्रतिनिधी :- अहमदगरमध्ये देशातील पहिली सहकार परिषद पार पडली. या सहकार परिषदेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा उपस्थित होते. या सहकार परिषदेत अमित शहा यांनी भाषण करताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा बँकेला आयडियल मानलं जात होतं. पण आज स्थिती काय झाली आहे केवळ तीनच आहेत. काय झालं? हजारो कोंटींचे घोटाळे कसे झाले हे घोटाळे काय रिझर्व्ह बॅंकेने केले का ? तर अजिबात नाही. मी राजकीय टीप्पण्णी करण्यासाठी आलो नाहीये. मी एवढ निश्चित सांगतो कि सहकारासाठी जी काही मदत लागेल ती सर्व मदत आम्ही करणार आहोत अशा शब्दांत सहकारमंत्री अमित शाह यांनी निशाणा साधला . 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने शाह यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहिले .

Image

या मेळाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.  अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथं विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्राची भूमी ही सहकारासाठी काशीएवढीच पवित्र भूमी असल्याचं मत देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. अहमदनगर येथील  प्रवरानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या सहकार परिषदेत अमित शहा बोलत होते. या परिषदेला देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

Image

सध्या सहकार चळवळीला मदतीची गरज आहे,  हे मला मान्य आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे सहकार खाते काढले असल्याचे शाह म्हणाले.  सहकारातील दोष आपल्याला काढावे लागतील. पण सहकार चळवळीवर ही वेळ का आली? असा सवालही त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्रामध्ये जिल्हा बँक या आदर्श मॉडेल असल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले.

Image

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्म पुरस्कारांच्या खऱ्या मानकऱ्यांना हे पुरस्कार दिले जावेत या उद्देशाने पद्म पुरस्कार वितरणाचे नवे युग  सुरु केले आहे असे सांगत केंद्रीय मंत्री शहा यांनी या प्रसंगी हिवरे बाजार ग्राम पंचायतीचे सरपंच पोपटराव पवार तसेच देशी वाणांच्या संवर्धनासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या आणि बीजमाता म्हणून प्रसिध्द असलेल्या राहीबाई पोपेरे या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला.

Image

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ज्या भूमीवरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा जयघोष गाजवला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच पवित्र भूमीवर मी आज तुमच्यासमोर उपस्थित आहे, म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंददायी दिवस आहे.

या देशाला जेव्हा भक्तिमार्गाच्या उपदेशाची सर्वात जास्त गरज होती त्याच वेळी भक्तीची चळवळ सुरु करणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांची देखील हीच भूमी आहे असे ते पुढे म्हणाले. त्यांनी सांगितले की संपूर्ण जगाला श्रद्धा आणि संयमाची शिकवण देणाऱ्या साईबाबांची ही भूमी आहे.

Image

हे स्थळ संपूर्ण देशातील सहकार चळवळीसाठी काशीप्रमाणेच पवित्र स्थळ आहे कारण पद्मश्री विखे पाटील यांनी इथेच सर्वप्रथम सहकार चळवळीचा पाया घातला असा गौरवपूर्ण उल्लेख केंद्रीय मंत्री शाह यांनी केला.

ते म्हणाले की आजच्या सरकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय निर्माण केले. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी याबाबत कोणी विचार देखील केला नव्हता अशी टीका त्यांनी केली.

Image

केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 75 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सहकार मंत्रालय स्थापन केले कारण त्यांना माहित आहे की सहकार हा विषय आजही तितकाच समयोचित आहे आणि सबका साथ, सबका विकास हा मंत्र केवळ सहकारी तत्वावर काम केल्यानेच यशस्वी होऊ शकतो.

एके काळी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सहकारी संस्था होती आणि त्यांच्याकडे एक आदर्श संस्था म्हणून बघितले जायचे, पण आता त्यातील केवळ तीनच उरल्या आहेत असे निरीक्षण शाह यांनी नोंदविले.

ते म्हणाले की, “मी कोणत्याही प्रकारची राजकीय वक्तव्ये करण्यासाठी येथे आलेलो नाही. मात्र सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांना मी हे आवर्जून सांगू इच्छितो की सरकार तुमच्यासोबत आहे, पंतप्रधान मोदी तुमच्यासोबत आहेत.”

आता सहकारी चळवळीवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही देऊन शहा म्हणाले की आपल्याला यासोबत चळवळीत पारदर्शकता आणावी लागेल आणि आपली कार्यक्षमता देखील वाढवावी लागेल.

ते पुढे म्हणाले की आपल्याला या चळवळीत व्यावसायिक तत्वावर काम करणाऱ्या युवकांना सोबत घ्यावे लागेल, सहकार्याचा मंत्र देऊन त्यांना सहकारी चळवळीत सामावून घ्यावे लागेल आणि त्यांना त्यांचे योग्य स्थान देखील द्यावे लागेल.

सहकार चळवळीला कोणतीही मदत लागली तर नरेंद्र मोदी यांचे सरकार अहोरात्र आणि 365 दिवस त्यासाठी सज्ज आहे असा शब्द देऊन शाह यांनी सांगितले की आम्हांला या चळवळीची प्रगती झालेली पहायची आहे.

ते म्हणाले की जेव्हा सहकार मंत्रालयाची स्थापना झाली तेव्हा अनेक लोकांनी विचारले की याची उपयुक्तता काय आहे, पंतप्रधान मोदी हे काय करत आहेत, देशाला कुठे घेऊन चालले आहेत.

त्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी आज येथे आलो आहे असे सांगून केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, आज देशातील एकूण साखर उत्पादनापैकी 31% साखरेचे उत्पादन सहकारी साखर कारखान्यांमध्ये होते, तसेच दुधाच्या एकूण उत्पादनापैकी 20% उत्पादन सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्था करतात. एकूण उत्पादित गव्हापैकी 13% गहू आणि तांदळाच्या एकूण उत्पादनापैकी 20% तांदूळ यांची खरेदी सहकारी संस्थांतर्फे केली जाते, याशिवाय, देशातील 25% खतांची निर्मिती, उत्पादन आणि वितरण सहकारी संस्थांच्या माध्यमातूनच होते हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन केंद्रीय मंत्री शाह यांनी केले. 

“भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था आणि कृषक भारती सहकारी संस्था  या अशा सहकारी संस्था आहेत, ज्यांचा जगभरात अभ्यास केला जातो, लिज्जत पापड संस्थेचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून महिलांच्या संस्था येतात , अमूल ही अशी एक सहकारी संस्था आहे जी दररोज सकाळ संध्याकाळ 36 लाख भगिनींना पैसे देण्याचे काम करते, हे सहकाराचे यश आहे,असे श्री शाह म्हणाले. 

आपल्याकडे  उत्पादन करण्याची, कारखाना उभारण्याची, कारखाना चालवण्याची आणि विपणन करण्याची फारच कमी आर्थिक क्षमता असेलही कदाचित  परंतु आपल्याकडील  संख्या मोठी आहे.सहकारातून आपण सगळे एकत्र येतो, मग आपण कोणाहीसमोर त्याच सामर्थ्याने  न डगमगता उभे राहू शकतो इतकी ताकद आपली निर्माण  होते, हाच  सहकाराचा मूलमंत्र आहे.आणि याच मूलमंत्राच्या आधारावर आजवर देशभरात सहकारी संस्था चालवल्या गेल्या आहेत, असे शहा यांनी सांगितले. .

देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून साखर कारखानदारांच्या समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या   समस्या एकामागून एक  सोडविण्यात आल्या.आमच्या एकाही मंत्र्याचा कच्ची साखर आयात करण्यासंदर्भात कोणताही व्यवहार नव्हता असे सांगत कच्च्या साखरेवर आयात शुल्क लावण्याचे काम   नरेंद्र मोदीजींनी केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

साखर निर्यातीवर  निर्यात अनुदान देण्याचे काम मोदी सरकारने केले यासोबतच  इथेनॉलचा वापर वाढवणे, त्याचे मिश्रण वाढवणे, इथेनॉलच्या किमती वाढवण्याचे कामही आपल्या सरकारने केले आहे.साखर कारखाने चालू   ठेवण्यासाठी  आणि एकही सहकारी साखर कारखान्याचे खाजगी कारखान्यात रूपांतर करण्याची वेळ येऊ नये यादृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही सहकार मंत्र्यांनी दिली.

अमित शहा म्हणाले की, मी काही मोडण्यासाठी  नाही तर सहकारात भर घालण्यासाठी आलो आहे, मात्र राज्य सरकारनेही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सहकाराकडे बघावे.मी मूक प्रेक्षक म्हणून शांत  बसू शकत नाही, ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणूनच आज मी इथे खूप चांगल्या पद्धतीने सांगायला आलो आहे की, तुम्ही सर्वांनी यापलीकडे जाऊन  विचार केला पाहिजे . माझ्या  समोर एखादा प्रश्न आला तर  सहकारी संस्था   कोण चालवतंय हे कुणी पाहणार नाही मात्र ती कशाप्रकारे चालते आहे ते नक्के बघितले जाईल, याची मी खात्री देतो आणि राज्य सरकारनेही याच पद्धतीने काम करायला हवे, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली.

सहकार कोणत्याही क्षेत्रातील असो आर्थिक क्षेत्रातील असो, साखर कारखान्याच्या क्षेत्रातील  असो, दूध क्षेत्रातील असो, खताच्या  क्षेत्रातला असो , वितरण क्षेत्र  किंवा  विपणन क्षेत्रातला असो, सहकाराला आजच्या काळाशी सुसंगत बनवावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

Image

जेव्हा सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्याची वेळ आली होती, त्याचवेळी मोदीजींनी सहकार मंत्रालयाची स्थापना केली. आपण  सहकाराचे  विद्यापीठ बनवणार आहोत, आपण  बहुराज्यीय सहकारी कायद्यातही बदल करणार आहोत आणि देशातील सर्व प्राथमिक कृषी पतसंस्था (पीएसीएस ) संगणकीकृत करायच्या आहेत. जी क्षेत्र सहकाराशी संबंधित नाहीत त्या  क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांना सहकाराशी जोडण्यासाठी सचिवांची समिती कार्यरत असून, येत्या काही दिवसांत 25 वर्षांपासूनची सहकार चळवळ पुनरुज्जीवीत  करण्याचे काम करणारे सहकार धोरणही आणले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकार सहकार चळवळीला बळकट करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.सहकार चळवळीने आणखी 50 से 100 वर्षे या देशातील गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांना  विकासाची समान संधी द्यावी , समान संधी प्रदान कराव्यात आणि सर्वांना समानतेच्या सूत्रात  बांधून संपूर्ण समाजाचा विकास करावा, अशी मोदीजींची इच्छा आहे, असे अमित शहा यांनी यावेळी सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं.

Image

देवेंद्र फडणवीस म्हणले की,  सहकार चळवळ मोडीत निघाली असे म्हणत आहेत तेच सहकारी साखर कारखाने विकत घेत आहेत. अशी अप्रत्यक्ष टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर नाव न घेता केली. सहकारी साखर कारखाने नेत्यांच्या घशात घातले अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला जगविण्याचं काम केलं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.