प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच केली बहिणीची हत्या
कोयत्याने गळा चिरत शीर केले धडावेगळे,वैजापूर तालुक्यातील लाडगांव शिवारातील घटना
वैजापूर तालुक्यात सैराट चित्रपटातील दृश्याची पुनरावृत्ती
वैजापूर ,५ डिसेंबर /प्रतिनिधी :- प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच 19 वर्षीय बहीणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील लाडगांव शिवारात ५ डिसेंबर रोजी रविवारी दुपारी १२ वाजेदरम्यान घडली .किशोरी मोटे असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील लाडगाव शिवारात ही घटना घडली असून, प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून भावानेच सख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली आहे.मुलीचा भाऊ आरोपी संकेत संजय मोटे याच्याविरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. तो मुळचा गोयगाव येथील रहिवाशी आहे.त्याने प्री प्लॅनिंग केले होते त्यासाठी आरोपीने २००३ चे आधार कार्ड बनवले होते. मात्र त्याचे इतर डॉक्युमेंट बघितले असता त्याचे वय १८ वर्षे असल्याचे समोर आले.
गोयगाव येथील अविराज थोरे आणि किशोरी मोटे यांचे महाविद्यालयीन काळापासून प्रेमसंबंध होते.त्यांनी ६ महीन्यापुर्वीच घरातुन पळून जात आळंदी येथे प्रेमविवाह केला होता.मात्र मुलीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नसल्याने त्यांच्या मनात राग होता.दरम्यान प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आरोपी अल्पवयीन भाऊ आईसोबत रविवारी लाडगाव शिवारातील शेतवस्तीवरील घरी गेला होता. यावेळी त्याने रागाच्या भरात कोयत्याने बहिणीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. एवढ्यावरच न थांबता धडावेगळ्या केलेल्या बहिणीच्या शीरा सोबत सेल्फी देखील घेतल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
भावाने इतक्या निर्घृण वार केले की, बहिणीचे मुंडके धडावेगळे झाले. दरम्यान हा सर्व प्रकार पाहून किशोरीचा पती अविराज थोरे याने स्वत:चा जीव वाचवत तेथुन पळ काढत विरगाव पोलिस ठाणे गाठुन पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आरोपी भाऊ आणि आई यांना ताब्यात घेतले आहे.३०२, २०१ नुसार विरगाव पोलिसमध्ये गुन्हा दाखल झाला. पुढील तपास विरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय नरवाडे हे करत आहे.
खोट्या प्रतिष्ठेसाठी आणखी किती किशोरींचे बळी जाणार
प्रेमविवाह केलेले अविराज थोरे आणि किशोरी मोटे हे दोघेही एकाच समाजाचे विशेष म्हणजे दोघांचे सोयरे संबंध देखील जुळत होते. मात्र अविराजची घरची परिस्थिती सर्वसाधारण होती तर मृत किशोरी हिचे वडील मोठे बागायतदार.त्यामुळे या दोन्ही कुटूंबात आर्थिक दरी होती. म्हणुनच केवळ खोट्या प्रतिष्ठेसाठी भावाने बहिणीचा जीव घेतला आहे.मात्र पुरोगामी म्हणवणा-या या महाराष्ट्रात खोट्या प्रतिष्ठेसाठी आणखी किती किशोरींचे बळी जाणार ….? हे एक न उलगडणारे कोडे आहे.