महाराजा सयाजीराव गायकवाडांचे कार्य नाटक व चित्रपटांच्या माध्यमातून जगासमोर आणणार: स्वागताध्यक्ष छगन भुजबळ

महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या ५० पुस्तकांचे प्रकाशन

नाशिक ,४ डिसेंबर /प्रतिनिधी:- महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले, डॉ. बाबसाहेब आंबेडकर अशा अनेक युगपुरुषांना मदत केली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड हे माणसांमधील कर्तृत्व ओळखून त्याच्या कर्तृत्वाला चालणा देऊन असामान्य माणसं घडविणारा राजा होता. या राजाचे कार्य नाटक व चित्रपटांच्या माध्यमातून जगासमोर आणणार असल्याचे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले आहे.

कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या 50 ग्रथांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आहे. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदयाचे कुलपती राजमाता शुभांगीनींराजे गायकवाड , दूरदृश्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत उपस्थित होते. समितीचे सदस्य सचिव बाबा भांड, माजी आमदार पंकज भुजबळ, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे समन्वय प्रा.हरी नरके, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, विश्वास ठाकूर उपस्थित होते.


पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज महाराज सयाजीराव गायकवाडांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे, ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बा‍ब असून या समितीने 50 पुस्तकांचे प्रकाशन करुन षटकार मारला आहे. तसेच महाराज सयाजीराव गायकवाडांचे जन्मस्थळ नाशिक असून आज त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन जन्मभूमीत व मराठी साहित्य संमेलनात होत असल्याने आजचा दिवस भाग्याचा असल्याचे सांगत पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी आनंद व्यक्त केला.


महाराज सयाजीराव गायकवाड यांनी फुलेंना ‘महात्मा’ ही पदवी बहाल करुन महात्मा फुलेंचे सर्व विचार राज्यकर्ता म्हणून अमलांत आणणारा पहिला राजा होता. तसेच लेखणी लिहीणाऱ्याच्या विचारसरणीवर अवलंबून असून पूर्वी बहूजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात नव्हता. आता बहूजन समाज शिकला असून ते ही आता आपल्या बहूजन समाजाचे साहित्य संपदा जगासमोर आणून ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहे, असेही यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

महाराजा सयाजीराव गायकवाडांचे संपूर्ण साहित्य संपदा लोकांसमोर आणणार: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्यावतीने महाराजा सयाजीराव गायकवाडांचे संपूर्ण साहित्य संपदा लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ऑनलाईन उपस्थित होते, त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारे महाराजा सयाजीराव गायकवाड हे पहिले राजे होते. यशवंतराव चव्हाण यांनी 1962 साली महाराजा सयाजीराव गायकवाड या दूरदशी राजाचे समग्र साहित्य महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता, पंरतू यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला केंद्रीय संरक्षण मंत्री जावे लागले असल्याने राजाचे समग्र चरित्र साहित्य प्रकाशन प्रकल्प तिथेच थांबला होता. पंरतु आता शक्य तितके महाराजा सयाजीराव गायकवाडांचे साहित्य संपदा शासनमार्फत प्रकशित करण्यात येणार असल्याचे श्री. उदय सामंत यांनी सांगितले.

महाराजा सयाजीराव गायकवाडांचे कार्य आजही समाजातील सर्व घटकांना दिशादर्शक: कुलपती राजमाता शुभांगींनीराजे गायकवाड

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी राज्यकारभार चालवितांना समाजातील सर्व घटकांचा विचार केला आहे. त्यामुळे महाराजांचे कार्य आजही समाजातील सर्व घटकांना दिशादर्शक आहे. तसेच आज महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जन्मभूमीत त्यांच्या 50 पुस्तकांचे प्रकाशन होत आहे असल्याने अभिमान वाटत असल्याचे राजमाता शुभांगींराजे गायकवाड यांनी सांगितले. तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड यांची साहित्य संपदा व कार्य राज्य शासनामार्फत लोकांसमोर नेण्यासाठी प्रयत्न केला जात असून अशाप्रकारे महाराजा सयाजीराव गायकवाडांची राष्ट्रीय पातळीवर ओळख होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही राजमाता शुभांगींनीराजे यांनी व्यक्त केली आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या 50 ग्रंथाचे प्रकाशन चार टप्प्यात

महाराज सयाजीराव लेखन आणि सुप्रशासन 11 ग्रंथ, सयाजीरावांसबंधी स्वंतत्र लेखन व जगप्रवास 16 ग्रंथ, मराठी, इंग्रजी चरित्र ग्रंथ शिक्षण अहवाल, स्त्री शिक्षण 13 ग्रंथ, हिंदी ग्रंथ प्रकाशन भाषण, पत्र संग्रह, गौरवगाथ 10 ग्रंथ असे एकूण 50 ग्रंथाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.