मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त केले स्मरण

मुंबई,२१ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले आहे.

आधुनिक महाराष्ट्र ज्यांच्या असीम त्याग, समर्पणातून उभा राहिला आहे, त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, भाषिक स्वातंत्र्य आणि मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी या महाराष्ट्र सुपुत्रांनी प्राणपणाने दिलेला लढा अभूतपूर्वच राहिला आहे. हा लढा अजूनही संपलेला नाही. जग आणि पुढच्या पिढीपर्यंत या सीमा लढ्याच्या संघर्षाची धग पोहोचविणे, तिची धार कायम ठेवणे हेच या वीर महाराष्ट्रपुत्रांना खरे अभिवादन आहे. त्यासाठी मराठीची वज्रमूठ करूया.