देशात अराजक माजण्यासाठी दंगलीचा प्रयोग, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
राज्यात सरकारचं अस्तित्व नाही अन् उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कुणीही तयार नाही
मुंबई ,१६ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- अमरावती, नांदेडमध्ये झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत होती, सरकारच्या समर्थनानं हे मोर्चे निघाले, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता सरकारविरोधात रस्त्यावर संघर्ष अटळ असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मालेगावची घटना साधी नाही, देशात ध्रुवीकरण करण्याचा हा एक प्रयोग आहे, महाराष्ट्रात हजारो लोक अचानक एकाचवेळी मोर्चा कसे काढतात, संपूर्ण सरकारच्या मदतीन मोर्चे काढले जातात, मु्ददाम हा भेद करण्याचा प्रयोग केला जातो. हिंदुंची दुकानं जाळली जातात, त्यावेळेस मात्र महाविकास आघाडी नेत्यांची तोंड शिवलेली असताता, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. कोणतीही घटना घडली नाही, मशीद जाळली म्हणून वेगळेच फोटो दाखवले जातात, जून्या मिरवणूकीचे फोटो दाखवून बघा त्रिपुरात हिंदु हल्ले होतात हे सांगतात, देशात अशांतता निर्माण केली जाते. राहुल गांधी यांना याची कल्पना होती, पण मु्द्दाम वेगळे वातावरण निर्माण केलं गेलं असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मी अजूनही मुख्यमंत्री आहे असं मला वाटतं, असं विधान केलं होतं. आता त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना राज्यातील जनता मुख्यमंत्री मानायला तयार नाही, असं विधान केलं आहे.
सध्या महाराष्ट्रावर विश्वासहार्यतेचं संकट उभं राहिलं आहे. देशातील सर्वाधिक प्रगतीशील, सर्वाधिक समृद्ध आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य आहे. पण या राज्यात सरकार कुठे आहे? हे विचारण्याची वेळ आली आहे. सरकारचं अस्तित्वच दिसत नाहीये. एक मुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री मानतो. पण आपल्या स्वतच्या पलिकडे पाहायला तयार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृती बरी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
हिंदूंची दुकाने जळू देणार नाही
आम्ही दंगल करणारे लोक नाही. भाजप कधी दंगल करत नाही. पण आमच्या अंगावर कोणी चालून आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढे आम्ही हिंदूंची दुकाने जळू देणार नाही. सरकार अशा घटनांना आशीर्वाद देणार असेल तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच आम्हाला कुणालाही घाबरण्याचं काम नाही. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामीही नाही. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. जेव्हा वर्षातून बाहेर पडलो. तेव्हा चार महिने भाड्याच्या घरात राहिलो. स्वत:चं घर नव्हतं. त्यामुळे घाबरण्याचं काम नाही, असं ते म्हणाले.
सरकारचे अस्तित्व दिसत नाही, प्रत्येकजण स्वतः सीएम समजत पण जनतेच्या समस्याकडे पाहायला कोणी नाही, पाच वर्ष भाजपच्या सरकारमध्ये
समृद्धी महामार्ग, विकासकाम यावर चर्चा होत होती. पण या सरकारमध्ये हर्बल तंबाखू, गुन्हेगार, भ्रष्टाचार यावर चर्चा होत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्यातील आताचं भ्रष्ट सरकार
राज्यातील आताच सर्वात भ्रष्ट सरकार असून प्रत्येक विभागात एक वाझे आहे, आम्हाला काय मिळणार याचाच या सरकारमध्ये विचार होत असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे. राज्यात सध्या कायद्याचं राज्य नाही तर काय ते द्या या पद्धतीने राज्य चालतं. राज्यात नुसती वाटमारी चालली आहे, शेतकऱ्यांकडे बघायला कुणी तयार नाही, राजकारणाचं गुन्हेगारीकरण चाललं आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
सरकारच्या विरोधात एल्गार
आयटी छाप्यात 500 कोटींची दलाली उघड झाली शेतकऱ्यांकडे मात्र पाहायला कोणी नाही, हे निर्लज्ज सरकार आहे, आता सरकारच्या विरोधात एल्गार पुकारावा लागेल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे:
➡️ आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट!
सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे.
एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत.
➡️ सरकार हे कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य आहे.
राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही.
➡️ राजकारणाचे गुन्हेगारीकरण !
राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आणि अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी. महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती.
➡️ आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामी नाही,
त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही.
➡️ अमरावतीत जे घडले ती कोणती घटना नाही तर एक प्रयोग आहे. सावध व्हा.
➡️ त्रिपुरात काय झाले?
26 ऑक्टोबर : बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात त्रिपुरात रॅली.
28 ऑक्टोबर : फेक न्युज फॅक्टरीचे काम सुरू, त्रिपुरा पोलिसांनी कारस्थान उघड केले.
8 नोव्हेंबर : राहुल गांधीचे ट्विट
आणि मग प्रयोग सुरू होतो.
हा हिंसाचार सरकार समर्थित.
➡️ अमरावतीत SRP च्या 7 तुकड्या होत्या. पण त्यांना कोणते आदेश दिले गेले नाही.
आझाद मैदानात जे झाले तो सेम पॅटर्न.
पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अटक नाही. आमचे पोलिस काय मार खाण्यासाठी आहेत आहे का ? देवेंद्र फडणवीस यांचा संतप्त सवाल
➡️ विचारांचा नक्षलवाद आता नाही.
आता तो दहशतवाद्यांशी निगडित आहे.
भाजपचा कार्यकर्ता कधीही दंगल करीत नाही.
पण कुणी अंगावर आले तर सोडणार नाही.
➡️ आम्ही सर्वसमावेशकतेचे राजकारण करतो,
पण लांगूलचालन करीत नाही.
लांगूलचालन करणाऱ्या शक्तींना वाटत असेल की आता आपले सरकार आहे, तर आपण काहीही करू. पण भाजपचा कार्यकर्ता असे होऊ देणार नाही.
➡️ एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात?
सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती‘ उपक्रम चालू आहे.
➡️ मराठवाडा, विदर्भाच्या सर्व योजना बंद!
➡️ शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही !
➡️ वैधानिक विकास मंडळ बंद !
➡️ सिंचन, पाण्याच्या योजना बंद !
➡️ शेतकऱ्यांची वीज बंद ! शाळा सुरू केल्या आणि लगेच शाळांच्या वीज कापल्या.
➡️ केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कमी केला, तर देशातील २५ राज्यांनी त्यात भर घातली.
पण महाराष्ट्र मात्र काहीच करायला तयार नाही. हे म्हणतात उत्पन्नाचे दुसरे साधन नाही.
मंदिर बंद होते, पण दारू सुरू होती ना!
त्यातून तुम्ही कमाई केलीच ना.
➡️ छोटी-छोटी राज्य रडत नाही तर लढतात.
महाराष्ट्रात मात्र रोज सकाळी मा. नरेंद्र मोदींचे नाव घेऊन रडतात.
बिल्डरांना सवलती देताना यांना GST आठवत नाही, गरिबांना, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटले की, जे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि मिळत राहतील त्या GSTचे रडगाणे गातात.
➡️ १०० कोटी लसीकरण केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप अभिनंदन.
अर्थव्यवस्था, लोकांचे जीव वाचवण्यासाठी हे लसीकरण अतिशय आवश्यक होते. हे सोपे काम नव्हते. पण ते भारताने करून दाखविले.
➡️ पहिल्या दिवशीपासून कोविडचा सामना करताना मा. नरेंद्र मोदीजी यांनी दृढता दाखविली.
➡️ या महाविकास आघाडी सरकारने सर्वांसोबत विश्वासघात केला आहे.
सामान्य माणसाची ताकद आता दाखविण्याची वेळ आली आहे.
जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी लढायला मैदानात उतरण्याची वेळ आली आहे.