राष्ट्रवादीचे अभय पाटील चिकटगांवकर भाजपच्या वाटेवर ; वैजापूर तालुक्यातील राजकारण तापणार

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

वैजापूर ,१५ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याचे माजी आमदार कैलास पाटील चिकटगांवकर यांचे चिरंजीव व औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगांवकर यांनी स्थानिक पातळीवर असलेल्या  पक्षातील गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या मुबंई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

अभय पाटील चिकटगांवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विविध पदे भूषविलेली असून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ऐनवेळी पक्षाची उमेदवारी देण्यात आली होती.या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. विधानसभा निवडणुकीला उभे करून पक्षातील काही मंडळींनी त्यांचा गेम केल्यामुळे तेंव्हापासून ते नाराज दिसत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एका कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद येथे आले असता अभय पाटील यांनी पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सोपविला होता. तेव्हापासून ते पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर राहात होते. पक्षात घुमसट होत असल्याने अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे उद्या ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व जिल्हा परिषद – पंचायत समितीच्या निवडणुकाच्या तोंडावर असतांना अभय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.