वारकरी दाम्पत्याचा सत्कार करताना जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार भारावून जातात

कार्तिक एकादशी निमित्त निळा येथील टोणगे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

नांदेड,१५ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- कार्तिक एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आरध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांच्यासमवेत मानाचे वारकरी म्हणून संधी मिळाली ती लोहा तालुक्यातील निळा गावच्या टोणगे दाम्पत्याला. मागील 30 वर्षापासून पंढरपूरची वारी करणाऱ्या टोणगे दाम्पत्याचा मानाचे वारकरी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार व सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला.

राज्याच्या 12 कोटी जनतेच्यावतीने आज पांडुरंगाच्या चरणी माथा टेकण्याची संधी मिळाली. कोरोना सारख्या आरीष्टातून राज्याला सावरता आले. जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. अशा या काळातून सावरतांना राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाला स्थैर्य व समृद्धी येऊ दे. महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे सर्व धर्मातील लोक गुण्यागोविंदाने व एकदिलाने राहून त्यांच्या आरोग्याची, प्रगतीची मी प्रार्थना केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगून टोणगे दाम्पत्याचा मानाचे वारकरी म्हणून सत्कार करतांना ते कृतज्ञतेने भारावून गेले. यावेळी टोणगे दाम्पत्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांचा यथोचित विठ्ठल राखुमाईची मूर्ती देऊन सत्कार केला. तीस वर्षे विठ्ठलाची वारी करणाऱ्या टोणगे दाम्पत्याच्या भक्तीचा गौरव करुन त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले या शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. या दाम्पत्यासाठी राज्य परिवहन महामार्गाच्या बसद्वारे प्रवासासाठी पास हस्तांतरित करतांना लवकरच एसटीचा प्रश्न सुटेल असे भाष्य करीत वस्तुस्थिती अजित पवार यांनी सर्वांपुढे मांडली.