अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई होणार- पालकमंत्री हसन मुश्रीफ
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग; ११ रुग्णांचा मृत्यू
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्तांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती
मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून पाच लाखांची मदत जाहीर
अहमदनगर सामान्य रुग्णालयातील घटना अत्यंत वेदनादायी- : जलसंपदा मंत्री जयंत पाटील
अहमदनगर ,६ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दवी असून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हा रुग्णालयास भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दुर्घटना दिवसा घडली असल्याने त्याबद्दल चौकशीनंतर नेमकेपणाने वस्तुस्थिती समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दुर्दैवी घटनेत मृत्यु पावलेल्याच्या नातेवाईकांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येत असून चौकशीदरम्यान रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घेणार असलयाने सत्य बाहेर येईल असे ते पालकमंत्री म्हणाले.
या समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई होईल. दुर्घटनेच्यावेळी रुग्णालयात अनुपस्थित असणाऱ्या संबधितांवरही कारवाई करण्यात येईल. ऱ्हदय पिळवटून टाकणारी अतिशय दुदैवी घटना असल्याचे ते म्हणाले. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. गेल्या काही काळात स्वत: रुग्णालयाला तीन चार वेळा भेट दिली होती. आरोग्य सेवेसाठी पुरेसे अनुदान शासनाकडून देण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली. फायर ऑडिटरांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे ते म्हणाले. या घटनेचा लवकरात लवकर चौकशी करणार येऊन संबधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. आगेतील,जखमींवर योग्य उपचार करण्यात येतील आणि त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरिक्षक दीपक पांडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अहमदनगर सामान्य रुग्णालयातील घटना अत्यंत वेदनादायी- : जलसंपदा मंत्री जयंत पाटील
अहमदनगर:-येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाल्या मुळे मला तीव्र दुःख झाले असून आजची घटना ही अत्यंत वेदनादायी आहे. अशा दु:खद भावना राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या. त्यांनी आज सायंकाळी सामान्य रुग्णालयास भेट देऊन येथे घटनेची माहिती घेतल्यानंतर त ते पत्रकारांशी बोलत होते. रुग्णालयात सकाळी ही दुर्घटना घडल्यानंतर संपूर्ण हॉल मध्ये धुर पसरला होता या धुरामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यावेळेस येथे स्थानिक आमदार, संग्राम जगताप व त्यांचे सहकारी आणि प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी तत्परता दाखवत तात्काळ मदत कार्य सुरू केले व रुग्णांना बाहेर काढून दुसर्या जागी स्थलांतरीत केले. या घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नेमण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले चौकशी समितीमध्ये हा प्रकार कशामुळे झाला आहे याचा अभ्यास करून,यात कोण कोण दोषी आहेत याची जबाबदारी निश्चित झाल्यावर दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. सखोल चौकशी होईपर्यंत आत्ताच काही सांगणे योग्य होणार नाही रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाला त्यामुळे काही रुग्ण दगावल्यचा प्राथमिक अंदाज आहे. तज्ञांकडून संपूर्ण अतिदक्षता विभागाची तपासणी करून ही घटना कशामुळे घडली आहे, याचे निष्कर्ष घ्यावे लागतील त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले.