महसूल विभागाकडून याद्यांचा खेळ सुरूच ; वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही मदतीची रक्कम जमा नाही
जफर ए.खान
वैजापूर ,५ नोव्हेंबर :-
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी पूर्वी मदतीची रक्कम जमा करण्यात येईल असे शासनातर्फे सांगण्यात आले होते मात्र, शासनाकडून मदतीची रक्कम प्राप्त होऊनही वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप ही रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही.महसूल विभागाकडून याद्यांचा खेळ सुरू असून, बँकानाही सुटी असल्यामुळे शेतकऱ्यांना आणखी काही दिवस मदतीची वाट पहावी लागणार आहे.
वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे 1 लाख 4 हजार 816 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून,नुकसानीच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून मागणीच्या 75 टक्के म्हणजे 80 कोटी 4 लाख 86 हजार 250 रुपये प्राप्त झाले आहेत.शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्याच्या सूचना प्रशासन स्तरावरून देण्यात आल्या आहेत. मात्र तलाठ्यांकडून शेतकऱ्यांच्या सुधारित याद्या तयार करण्यास विलंब होत असल्याने दिवाळीच्या दिवसांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.
शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून 52 कोटी रुपयांचा निधी गुरुवारी (ता.4) शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत जमा करण्यात आला आहे.
बँकांना सलग सुट्या असल्यामुळे मदतीची रक्कम प्रत्यक्ष हाती येण्यासाठी तसेच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होण्यासाठी बँका सुरू होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे. शासनाकडून प्राप्त झालेला संपूर्ण निधी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचा प्रयत्न महसूल विभागाकडून केला जात आहे.