खेळेन तर एकटीच नाहीतर गेम सोडेन – गायत्री दातार

मुंबई ,२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- ‘बिगबॉस 3’ च्या घरातील स्पर्धा दिवसेंदिवस अधिकच आव्हानात्मक होऊ लागली आहे. ‘बिगबॉस 3’ मधील सर्वच स्पर्धक ताकदीचे आहेत. आता गायत्री दातारही तगडी झुंज देताना दिसत आहे. स्पर्धकांचे चाहते त्यांना ‘चुगली बूथ’च्या माध्यमातून उत्तम खेळण्यास मदत करत आहेत. तसेच त्यांना योग्य तो सल्ला देऊन सावधही करत आहेत.

गायत्रीही उत्तम खेळताना दिसत आहे. तिच्या खेळण्यावर बाकीच्या स्पर्धकांच्या सूचनांचा प्रभाव होत असल्याचे तिच्या चाहत्यांनी ‘चुगली बुथ’च्या माध्यमातून तिला सांगितले. ‘बिगबॉस 3’चे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही अगोदर दुसऱ्यांच्या विचारांनी प्रभावित न होता स्वतःचा खेळ खेळण्याचे गायत्रीला सांगितले होते. याचा तिने गांभीर्याने विचार केला असता ही गोष्ट तिच्याही लक्षात आली. स्वतःचे मत असूनही दुसऱ्यांच्या बोलण्याचा आपल्या निर्णयांवर, खेळावर परिणाम होऊ शकतो, हे आता तिच्या लक्षात आले आहे. आता कोणाच्याही बोलण्याचा स्वतःवर प्रभाव होऊ न देता, कुणाचेही न ऐकता फक्त स्वतःच्या विचारांनी खेळण्याचे तिने ठरवले आहे. यामुळे गायत्री दातारची पुढील खेळी पाहणे उत्साहाचे ठरणार आहे. गायत्रीच्या या निर्णयामुळे गायत्री, मीरा, जय या त्रिकुटाची मैत्री यापुढे अशीच राहणार का? असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला आहे.