लसीकरणाची किमान 1 मात्रा पूर्ण झालेल्या असतील तीच दुकाने – आस्थापना यापुढे खुली करण्यास मुभा

कोविड 19 लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना

औरंगाबाद,२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- शासनाच्या सूचनानुसार सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्‍थापनांमध्‍ये Covid-19 प्रतिबंधात्‍मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्‍याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी जिल्हा क्षेत्राकरिता पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

1) जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्‍थापनांमध्‍ये कार्यरत अधिकारी/ कर्मचारी यांच्‍या कोविड-19 प्रतिबंधात्‍मक लसीकरणाच्‍या दोन मात्रा पूर्ण झाल्‍याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्‍या कार्यालय प्रमुख/आस्‍थापना प्रमुख यांनी करावी. कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण पूर्ण झाल्‍याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी / कर्मचा-यांकडून प्राप्‍त करुन घ्‍यावे. ज्‍या कर्मचा-यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्‍यास नजीकच्‍या लसीकरण केंद्रात जावे किंवा लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.
2) ज्या गावात/वॉर्डात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, त्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका यांनी विशेष मोहिम राबवून, जास्त नागरिकांचे लसीकरण करावे व लसीकरणाचे 100% उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करुन त्यादृष्टीने कार्यवाही करावी.
3) सर्व प्रकारचे दुकाने / आस्थापनांतील हॉटेल इ. मालक व कामगार/कर्मचारी यांच्या लसीकरणाची किमान 01 मात्रा (Dose) पूर्ण झालेल्या असतील तीच दुकाने / आस्थापना यापुढे खुली करण्यास मुभा राहील.
4) जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/अनुदानित संसथा/विना अनुदानित संस्था व खाजगी आस्‍थापनांमध्‍ये कामकाजास्‍तव येणा-या सर्व अभ्‍यागतांना लसीकरणाची किमान 01 मात्रा झालेली नसल्यास, त्यांना कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत “No Vaccine No Entry” हा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जाईल याची सर्वांनी नोंद घेऊन पूर्तता करावी.
5) विविध मागण्यांबाबत शासकीय कार्यालयात येणा-या शिष्टमंडळातील सदस्यांनाही कोविड-19 चा प्रथम डोस अनिवार्य : डोस घेतल्याची खात्री केल्यानंतरच प्रवेश मिळेल.
6) जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातून कोणतेही शासकीय प्रमाणपत्र/NOC/ दाखला निर्गमीत करण्यापूर्वी अर्जदाराने लसीकरणाची किमान 01 मात्रा पूर्ण झाले असल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडलेले असावे. याबाबत सर्व कार्यालय प्रमुखांनी लसीकरणाबाबतची खात्री करुनच प्रमाणपत्र, दाखला व NOC निर्गमीत करण्याची कार्यवाही करावी.
7) सर्व शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र, शिकवणी / क्लासेस इ. तत्सम संस्थांमध्ये लसीकरणाची किमान 01 मात्रा पूर्ण झालेल्या विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, कर्मचारी व अभ्यागतांनाच संस्थेच्या इमारतीत अथवा आवारात प्रवेश राहील. याबाबतच्या सर्व सूचनांचे पालन करून सर्व कोविड-19 प्रतिबंधात्मक बाबीचे संबंधी सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक, संस्था प्रमुख यांची असेल. याचे उल्लंघन निदर्शनास आल्यास, अशा संस्था सदर बाबींच्या पुर्ततेपर्यंत Seal करण्यात येतील.
8) सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांच्या प्रवेशद्वारावरच लसीकरणाची किमान 01 मात्रा झाली असलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला जाईल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित धार्मिक व्यवस्थापनाची राहील.
9) सर्व शासकीय /अशासकीय अस्थापनांवर कार्यरत अधिकारी /कर्मचारी ज्यांची लसीकरणाची किमान 01 मात्रा पूर्ण झालेली आहे, अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच संबंधितांचे डिसेंबर 2021 चे वेतन अदा करण्यात यावे.
“No Vaccine No Travel in Bus” यानुसार आंतरजिल्हा व आंतरराज्य बसने / खाजगी प्रवासी वाहनाने प्रवास करण्यासाठी देखील लसीकरणाची किमान 01 मात्रा पूर्ण झालेली असणे बंधनकारक राहील. या सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे., मास्क वापरणे, 2 गज दुरी (6 फुट अंतर), सॅनीटायझर, आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे आनिवार्य आहे. तसेच लोकजागृतीतून लसीकरण मोहीम राबविण्यावर भर देण्यात यावा. लसीकरणास पात्र लाभार्थ्यांचे,100% लसीकरण (प्रथम मात्रा : First Dose) झाले पाहिजे. लसीकरणाचा दुसरा डोस Covishield -84 दिवस व Covaxin-28 दिवसांनी घेणे अनिवार्य आहे. Covid Appropriate Behavior (CAB) उल्लंघन करणा-यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत लागू राहील. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात विशेष सूचना देऊन स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.