गुंठेवारी व कर या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक
नागरिकांना स्वतःचा हक्काचं घर व पाणी मिळावे हा माझा हेतू : आमदार शिरसाट
औरंगाबाद,३०ऑक्टोबर /प्रतिनिधी:- औरंगाबाद शहरासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1680 कोटींची पाणी योजना मंजूर केली आहे. आता शहरासाठी प्रस्तावित पाणी योजना मंजूर झाल्यामुळे औरंगाबाद शहरवासीयांचा पाण्याचा कायमचा प्रश्न मिटत चालला आहे.
याच मंजूर 1680 कोटीची असलेल्या पाणी योजनेच्या माध्यमातून सातारा व देवळाई परिसरात 8 मोठे जलकुंभ बांधण्यात येणार आहे, त्यापैकी आज आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते पश्चिम विधानसभा मतदार संघातील नाथ टॉवरलगत, सातारा परिसर येथे दुसरा जलकुंभ बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या आधी देखील आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते सुधाकरनगर येथील जलकुंभाचे भूमीपूजन करण्यात आले होते त्या जलकुंभाचे काम देखील प्रगतीपथावर आहे.
आमदार शिरसाट म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या पाण्याचा प्रश्न हा माझा हक्काचा प्रश्न आहे, माझ्या मतदार संघात राहणारा प्रत्येक नागरिक हा माझा परिवारातील सदस्य आहे, त्या सर्व नागरिकांना स्वतःचा हक्काचं घर व पाणी मिळावे हा माझा हेतू आहे, सातारा-देवळाई हा परिसर प्रामुख्याने मोठ्या लोक संख्येने वाढत आहे, त्यामुळे याठिकाणी कुठलेही पाण्याची पाईप लाईन नसल्यामुळे या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, त्यामुळे पुढील दीड वर्षेच्या आत सातारा-देवळाई परिसरात पाणी येईल, केवळ प्रसिद्धी मिळवणे हा माझा हेतू नाही, तर जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर धावून जाणे हे मी माझे कर्तव्य समजतो, आता केलेल्या जलकुंभाचे भूमिपूजन झाले असून लवकर कामाला सुरुवात होऊन या भागातील नागरिकांचा आता प्रश्न मिटणार आहे, निवडणूक येतील जातील पण जनतेच्या सेवेसाठी व प्रश्न सोडण्यासाठी मी कटिबद्ध आहे, तसेच गुंठेवारी व कर या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लवकरच बैठक घेवून हा प्रश्न सोडविण्यात येईल असे देखील प्रतिपादन आमदार संजय शिरसाट यांनी भूमिपूजन प्रसंगी केले.
यावेळी उपशहरप्रमुख रमेश बाहुले, विभागप्रमुख रणजीत ढेपे, हरिभाऊ हिवाळे, उपविभागप्रमुख संतोष जाटवे, शाखाप्रमुख ईश्वर पारखे, दिपक सुर्यवंशी, प्रविण मोहिते, शिवाजी शिंदे, संजय भुजबळ, बाळु मिसाळ, गजानन पाटील, अभिजित देशमुख, अजिंक्य गायकवाड, पंकज शिंदे, कैलास काळे, गणेश औटे, मदन गवळी, मिलिंद शिंदे, अरुण गुलाणे, नाना सोनवणे, अप्पा साळुंके, प्रभाकर संजयकर, रामेश्वर पेंढारे, डोंगरकर गुरुजी, नरेंद्र पवार, आबासाहेब देशमुख, अशोक कुरेवाल, महेश कदम सोपान पंडीत, परशुराम शेवाळे, संजय करवे, मोतीलाल तावडे, अॅड. अक्षय मेटे, सुनिल ठोकळ, सुभाष जाधव, चंद्रभान ठोंबरे, एल.डी. पाटील, सय्यद अबरार, गणेश मोटे, मोहीत कुमार, बाळु मुंडे, संदीप कौसडीकर, सोपनील दाभाडे, कुणाल सुर्यवंशी, रफीक शेख, प्रा. स्मिता अवचार, माधवी पाठक, ज्योती मचाले, सना मुंडे आदींची उपस्थिती होती.