समीर वानखेडे, के. पी. गोसावी, प्रभाकर साहील आणि वानखेडेचा ड्रायव्हर माने यांचा सीडीआर चौकशी समितीने काढावा – नवाब मलिक
यास्मिन वानखेडेंची नवाब मलिकांविरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
एनसीबीची पाच सदस्यांची टीमकडून समीर वानखेडेंची चार तास चौकशी
मुंबई ,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी:- एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि क्रुझवरील रेव्ह पार्टीतील दाढीवाला ड्रग्ज माफीया यांच्यात दोस्ताना असून त्यामुळेच त्याला कारवाईतून वगळण्यात आले आणि इतर लोकांना टार्गेट केले गेले आहे. याबाबतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चौकशी समितीने तपासावे. त्यात त्यांना काही सापडत नसेल, वरीष्ठ अधिकारी ज्ञानेश्वरसिंग माझ्याकडे आल्यास ते पुरावे द्यायला तयार आहे. माझा चौकशी समितीवर सवाल नाही परंतु हे प्रकरण गंभीर असून ते गंभीरतेने घेतले गेले नाही तर पुरावे सार्वजनिक करण्यात येतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
एनसीबीच्या अधिकार्याने एक पत्र माझ्याकडे पाठवले होते. ते पत्र डीजी आणि एनसीबीकडे माझ्या लेटरहेडवरुन पाठवले आहे. सीबीसीच्या मार्गदर्शक सूचनेवरुन निनावी पत्राची चौकशी होत नाही. परंतु ज्यापद्धतीने त्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो असेही नवाब मलिक म्हणाले.
समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी जी समिती आली आहे त्यांनी पंचांना बोलावले आहे. एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुराव्याआधारे कारवाई करते असे सांगितले जाते. प्रभाकर साहीलने संपूर्ण घटनेबाबत प्रतिज्ञापत्र व व्हिडीओ करून प्रसारित केला आहे. चौकशी समितीने समीर वानखेडे, के. पी. गोसावी, प्रभाकर साहील आणि वानखेडे यांचा ड्रायव्हर माने या सर्वांचा सीडीआर काढावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
ज्या गाडीचा वापर ५० लाख रुपये नेण्यासाठी करण्यात आला ती गाडी आणि ज्यापद्धतीने सॅम डिसुझा यांच्याकडे पैसे देण्यात आले हे बघता त्यांचा जबाब घेण्याची आवश्यकता नाही. कारण एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे चौकशी करते. त्यामुळे सीडीआर काढल्यास सर्व सत्य समोर येईल. एवढी मोठी देशाची एजन्सी आहे. आमच्यापेक्षा चार पावले अधिक काम करत असेल तर मी ज्याबाबत इशारा करत आहे त्याविषयाकडे ते लक्ष देतील, असेही नवाब मलिक म्हणाले.
एनसीबीने एक वर्षापूर्वी एक एफआयआर दाखल केला होता. त्यामध्ये एकालाही अटक झालेली नाही. त्या एफआयआरवरुन दीपिका पदुकोण, सारा अली खान यांना चौकशीला बोलावण्यात आले मात्र अटक करण्यात आली नाही. हे सर्व खोटं असेल तर त्यावेळी मीडियाने दाखवलेले फुटेज बघावे आणि खोलात जाऊन चौकशी करावी. मालदीव दौर्याकडे लक्ष दिल्यास मालदीवमध्ये कोण कोण अभिनेता आणि अभिनेत्री होते हा सगळा खेळ समोर येईल, याकडेही नवाब मलिक यांनी लक्ष वेधले.क्रुझ प्रकरणातील चौकशी भरकटवण्यासाठी नवाब मलिक गेले २० दिवस वेगवेगळ्या गोष्टी समोर आणत आहेत असा आरोप काही लोक करत आहेत. मात्र मी माझं काम करत आहे. ज्या गोष्टी खोट्या आहेत त्या समोर आणत आहे. ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे त्यांची पट्टी काढणं हे कर्तव्य आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
क्रुझवरील पार्टी ही फॅशन टिव्हीने आयोजित केली होती. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय आणि कोविड नियमांचे पालन न करता थेट शिपींग डायरेक्टरची परवानगी घेऊन पार्टी करण्यात आली. जहाजावर टार्गेट करून काही लोकांचे फोटो घेऊन ट्रॅक करण्यात आले. त्या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड होती, ती हातात रिव्हॉल्व्हर घेऊन उपस्थित होती. तिथल्या रेव्ह पार्टीत नाचताना एक दाढीवाला आहे, तो दाढीवाला कोण हे एनसीबीच्या अधिकार्यांना माहीत आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी आज केला. जे चौकशी अधिकारी आले आहेत त्यांनी क्रुझवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर त्यांना त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया उपस्थित होता हे दिसेल. खेळ तर झाला परंतु खेळाचा खेळाडू गाडी घेऊन का फिरत आहे याचे उत्तर एनसीबीने द्यावे. आज जे बोलत आहे त्याचे पुरावे येत्या काही दिवसात समोर ठेवणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
एका जाहीर सभेत बोलताना समीर वानखेडेची नोकरी जाईल आणि तो तुरुंगात असेल असे वक्तव्य केले होते. त्यावेळी मी कोणत्याही पोलीस यंत्रणेचा वापर केला नव्हता. मी समीर दाऊद वानखेडे याच्या धर्माबाबत प्रश्न उपस्थित केलेला नाही. समीर दाऊद वानखेडे याने फर्जी दस्ताऐवजाच्या आधारावर अनुसूचित जातीचा दाखला बनवून IRS ची नोकरी मिळवली आणि एका गरीब दलित मुलाचा अधिकार हिरावून घेतला, हा मुद्दा मी उपस्थित केला आहे. मी कुठल्याही धर्माची चर्चा केली नाही. समीर वानखेडेचा जो फर्जीवाडा आहे, फर्जी पद्धतीने दाखला बनवून त्या आधारावर नोकरी घेतली, मी शेअर केलेला जन्मदाखला फर्जी आहे असे ते बोलत आहेत तर खरा दाखला कुठे आहे, हे वानखेडे यांच्या कुटुंबातील लोकांनी सांगितले पाहिजे, असेही नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, समीर वानखेडे याचे मुस्लिम पद्धतीने जे लग्न झाले त्याचा फोटो आणि लग्नपत्रिका ट्वीटरवर शेअर करुन आज नवाब मलिक यांनी आणखी एका बोगस प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. ७ डिसेंबर २००६ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये लग्न (निकाह) केले. तो लग्न दाखलाही त्यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. त्या दाखल्यात दोन रकाने रिकामे करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुलीच्या वडिलांचे नाव आहे. त्यांच्या चुलत्याचे नाव आहे. तो रकाना यासाठी रिकामा ठेवण्यात आला आहे की, त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने घडत आहे. म्हणून ते दोन रकाने रिकामे आहेत. जन्मदाखल्यावर जे बोट दाखवत होते त्यांना सांगू इच्छितो की तो दाखला महानगरपालिकेच्या दस्तावेजातील एक हिस्सा आहे.जे कागद मी शेअर करत आहे ते खरे व सरकारी दस्तावेज आहेत हे जबाबदारीने सांगत आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिले तर २० वर्षानंतर त्यात छेडखानी करुन त्यावर स्टार बनवून वेगळया पद्धतीने नावाचा खेळ करण्यात आला आहे, असेही मंत्री नवाब मलिक म्हणाले.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा जाहीर केला आहे. त्यात मस्जिद आणि मदरश्याचा पत्ता आहे. वानखेडे यांचे कुटुंब कालपर्यंत आम्ही हिंदू आहोत, असे बोलत होते. मात्र या देशाचा कायदा सांगतो की, कुठलाही व्यक्ती धर्मांतर करत असेल तर त्याला दलित जातीचा लाभ मिळत नाही. विशेष करुन मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील लोकांना जातीचा लाभ मिळत नाही. जर असे लाभ मिळवायचे असतील तर मग देशाचे संविधानच बदलावे लागेल. सरसंघचालक मोहन भागवत मागे म्हणाले होते की सर्वांचे पूर्वज एकच आहेत. या देशातील बहुसंख्य लोक शूद्र होते. मग आम्ही देखील अनुसूचित जातीतील आहोत, असे मानले तर देशातील १५ कोटी मुसलमानांना अनुसूचित जातीचा लाभ मिळेल का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. मी सरकारी दस्तवेजावर बोलत आहे. कोण धर्म बदलत असेल तर मला कोणतीच आपत्ती नाही, परंतु देशाचा कायदा सांगतो की, अनुसूचित जातीचा असेल आणि धर्मांतर केले तर त्याला अनुसूचित जातीचा फायदा मिळत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यास्मिन वानखेडेंची नवाब मलिकांविरोधात तक्रार दाखल
समीर वानखेडे यांच्या बहीण अॅड. यास्मिन वानखेडे यांनी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यास्मिन यांनी मलिकांवर बदनामी केल्याचा आरोप केलाय. तत्पूर्वी यास्मिन वानखेडे यांनी काल पत्रकार परिषद घेत मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं.
नवाब मलिक हे ड्रग्ज लॉबीच्या सांगण्यावरूनच आरोप करत आहेत. मलिक यांच्यामागे ड्रग्ज लॉबी असणार. त्यांना पैसे देऊन आरोप करायला लावत असतील. ड्रग्ज लॉबींनी त्यांना प्रवक्ते म्हणून नेमले असावे. त्यांच्या जवायाला अटक केली होती. त्यामुळेच ते आरोप करत असावेत, असा दावा यास्मिन वानखेडे यांनी केला आहे.
मलिक आदरणीय मंत्री आहेत. पण त्यांना हे शोभत नाही. ते चुकीची माहिती देत आहेत. तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा. मीडियाला बोलवून केवळ प्रसिद्धी घेऊ नका. तुमचा वेळही वाया घालवू नका, असं त्यांनी सांगितलं. समीर वानखेडे यांचं बर्थ सर्टिफिकेट नेटवर मिळत नसल्याचं मलिक यांनी सांगितलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनाच बर्थ सर्टिफिकेट मिळत नाही. ते बर्थ सर्टिफिकेट का शोधत आहेत? त्यांची रिसर्च टीम आहे ना? मुंबईतील पोस्ट केलेला फोटो दुबईतील दाखवतात. मग त्यांनी शोधावं सर्टिफिकेट, असं सांगतानाच आमचं बर्थ सर्टिफिकेट शोधण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही कोण आहात? एखाद्या नोकरशहाचं सर्टिफिकेट काढण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचं सर्टिफिकेट कुणी काढलं आहे का? असा सवालही त्यांनी केला.
एनसीबीची पाच सदस्यांची टीमकडून समीर वानखेडेंची चार तास चौकशी
मुंबई ड्रग्स प्रकरणात पंच प्रभाकर साईल याने आरोप केल्यानंतर एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल चार तास चौकशी केली. समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवल्याची माहिती एनसीबीचे उप महानिदेशक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे. समीर वानखेडे यांनी या प्रकरणातील काही कागदपत्र सोपवल्याची माहितीही ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे.
मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणाच्या तपासावरुन समीर वानखेडे यांना हटवणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ज्ञानेश्वर सिंह यांनी लावण्यात आलेल्या आरोपात जोपोर्यंत ठोस पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत समीर वानखेडे मुंबई ड्रग्स प्रकरणात तपास अधिकारी म्हणून कायम असतील असं स्पष्ट केलं. एनसीबीची पाच सदस्यीय टीम सध्या मुंबईत आहे.