राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा केंद्र सरकावर निशाणा
बरं झालं लोकांच्या समोर वस्तुस्थिती यायला लागलीय! – जयंतराव पाटील
ठाणे ,२४ऑक्टोबर /प्रतिनिधी :-केंद्रीय सत्तेचा गैरवापर देशात सुरू आहे. क्रूझ ड्रग पार्टी आणि एनसीबी या केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या चौकशीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. बरं झालं लोकांच्या समोर वस्तुस्थिती यायला लागलीय, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे.
भाजपाप्रणित केंद्र सरकार आपल्या एजन्सींचा दुरुपयोग करतेय, लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करतेय, हे आज टीव्हीवर ऐकल्यावर व पाहिल्यावर लक्षात येते आहे, असे ते म्हणाले. आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली, त्यांना पकडून नेण्यात भाजपचे लोक पुढे होते. त्यानंतर अशी पैशाची मागणी होत असेल तर बरेच लोक यामध्ये सहभागी असण्याची शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वाच्या तिसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी ठाणे येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ठाणे शहर राष्ट्रवादी कार्यकारणी, ठाणे विधानसभा, मुंब्रा-कळवा विधानसभा, ओवळा-माजीवाडा विधानसभा, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जयंत पाटील आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.
ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस विचारांचा एकेकाळी गड होता. मात्र हळुहळू पक्षाची ताकद कमी पडू लागली. आता या भागासाठी एक अचूक रणनीती तयार करण्याची वेळ आली आहे, असे जयंत पाटील म्हणाले. आपल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, काम करण्याची रग आहे, वेळ आली तर कुणालाही शिंगावर घेण्याची धमक आहे. या ताकदीचा योग्य वापर करण्यासाठी लवकरच ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसाठी एक नवा कार्यक्रम तयार केला जाईल. मधल्या काळात भाजपच्या चुकीच्या धोरणांविरोधात ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जास्त आंदोलन केले. सध्याच्या परिस्थितीत वेगळे वातावरण असताना अशी आंदोलने घेतली त्याबद्दल ठाण्यातील नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे, असे ते म्हणाले. पक्षाला देशाचा एक सर्वोच्च नेता मार्गदर्शक म्हणून लाभला आहे, आपण एकत्र येऊन आपल्या पक्षाला सर्वोत्तम पक्ष बनवू हे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, गटनेते ठाणे मनपा नजीब मुल्ला, विरोधी पक्षनेते ठाणे मनपा शानू पठाण, गटनेता मनपा हनुमंत जगदाळे, प्रदेश चिटणीस सुहास देसाई , सय्यद भाई, मिलिंद पाटील विरोधी पक्षनेता, प्रमिला केणी , विरोधी पक्षनेता प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.