पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाले ; पळसगांव प्रकल्पात नारळी नदीचे पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या प्रयत्नाला यश

वैजापूर ,२४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मागील अनेक वर्षांपासून पळसगांव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे या प्रकल्पालगत असलेल्या नारळी नदीवर वळण बंधारा बांधून नदीचे पाणी पळसगांव प्रकल्पात सोडावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची होती.या प्रश्नात वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी लक्ष घातले व गेल्या सहा वर्षापासून याप्रश्नासंदर्भात सतत पाठपुरावा केला.युती शासनाच्या काळात या मागणीकडे दुर्लक्ष झाले.यासंदर्भात राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी 21 मे 2021 रोजी मुंबईत बैठक घेतली.

माजी आमदारभाऊसाहेब पाटील चिकटगांवकर व शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र व योजनेचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर करावे असे निर्देश दिले होते. 21 ऑक्टोबर 2021 रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत याप्रश्नी पुन्हा बैठक होऊन पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यासाठी शिफारस करण्यात आली. येत्या मंगळवारी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळणार आहे.त्यामुळे नारळी नदी जोड प्रकल्प होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.या प्रकल्पामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.या भागातील गाजगांव,खादगांव, देरडा,पळसगांव, शहापूर, घोडेगांव, कनकुरी,डोमेगांव,बोरगाव,येसगांव आदी जवळपास दहा ते बारा गावांना फायदा होणार आहे.