आता रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहणार

स्थानिक प्रशासन आवश्यकतेनुसार निर्बंधात बदल करणार

मुंबई,१९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून आता रेस्टॉरंट रात्री १२:०० वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११:०० पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोविडसाठी लागू असलेली मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन नागरिकांना आणि आस्थापनांना करावे लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध, हे परिस्थिती नुसार लागू राहील.

सध्या सणासुदीचे दिवस आहेत दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात ठेवून हा वेळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनातर्फे जारी एका पत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, पुर्वी लावलेल्या निर्बंधांमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसून फक्त रेस्टॉरंट, खाद्य पदार्थ पुरविणारे यांच्यासाठीच रात्री १२:०० पर्यंत आपले आस्थापन चालू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतर आस्थापना ११:०० वाजेपर्यंत चालू राहतील. स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये स्थानिक आवश्यकतेनुसार निर्बंध लाऊ शकते किंवा सवलत देऊ शकते असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.