सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर
मराठा आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही, ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडे यांचा निर्धार
बीड,१५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ठाकरे सरकार पडणार असल्याच्या तारखा देणाऱ्या भाजप नेत्यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा ,असा घरचा आहेरच पंकजा मुंडे यांनी दिला.
सावरगावच्या भूमीतून पंकजा मुंडे यांची तोफ प्रचंड धडाडली. अत्यंत अवेशात आणि आक्रमकपणे पंकजा मुंडे यांनी आपले मुद्दे मांडले. हे मुद्दे मांडतानाच त्यांनी थेट स्वपक्षीयांनाही जोरदार टोले लगावले. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडणार की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार पडणार नाही. आता यातून बाहेर पडा. विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत लक्ष घाला, असा घरचा आहेरच पंकजा यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
या मेळाव्याने कधी सत्ता पाहिली?
मला सांगा हा मेळावा होईल का नाही? चर्चा होती. माझ्यावर प्रेम करणारे सांगत होते, ताई मेळावा नको. का रे बाबा? म्हणे, सत्ता नाही. सत्ता नाही म्हणून मेळावा नाही? कधी या मेळाव्याने सत्ता बघितली? मुंडे साहेब सत्तेत होते का? लाखो लोक या मेळाव्याला येत होते. पण कसे राजा सारखे राहिलात? सत्ता नाही म्हणून कसं नाही? कुणी म्हणलं ताई अतिवृष्टी झाली, कोरोना आहे. लोकांची मनस्थिती नाही. अरे बाबा अशाच वेळी लोकांना ऊर्जा देण्यासाठी मला हा मेळावा घ्यायचा आहे. अधिकारी विचारायचे ताई किती लोकं येणार? मी म्हणाले मला माहिती नाही. भगवान बाबांचा कार्यक्रम आणि पोलिसांचं नातं जुनचं आहे. आता पाचशे पोलीस असतील तर लोकं किती येणार ते मी काय सांगू बाबा? एवढ्या संख्येने तुम्ही इथे आलात. मला असं वाटतंय की, भगवान श्रीकृष्ण माझ्यासमोर साक्षात आलेत. भगवान श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला विराट रुप दाखवलं तसं मला आज कृष्णाने विराट रुप दाखवलं, असं त्यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
माझा दौरा लिहून घ्या
मी काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. पण माझ्या आयुष्यात मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवान बाबांची मूर्ती आहे. या पवित्र स्थानावर उच्चार करायचा नाही, अशा कोणत्याशी शब्दाचा मी उच्चार करणार नाही. या स्थानावर ज्या व्यक्तीवर बोलून सुद्धा भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्याही व्यक्तीचा उल्लेख मला करायचा नाही. आणि अशा कुठल्याही प्रवृत्तीचा मला उल्लेख करायचा नाही, असं सांगून पंकजा यांनी आपल्या भाषणाचा रोख स्पष्ट केला. काही लोकांना वाटतंय मी घरात शांत बसले. ते लोक आज खूश असतील. पण माझा दौरा लिहून घ्या, मी आता 17 ते 20 तारखेपर्यंत दिल्लीत आहे. त्यानंतर मी 23 ते 25 मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात आहे. नंतर 12 डिसेंबरला ऊसाच्या फडामध्ये ऊसतोड कामगारांसोबत जाऊन मी गावागावात संवाद साधणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे यांचा निर्धार
दसरा मेळव्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर शपथ घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यामध्ये हार घालणार नाही आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याला फेटा बांधणार नाही ही शपथ घेतली आहे असा निर्धार पंकजा मुंडे यांनी केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वंचितांच्या दारापर्यंत जाऊन झुकून नमस्कार करुन त्यांच्या विकासासाठी झटण्याची शपथ या मेळाव्याच्या माधम्यातून शपथ मी खाते, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
जनतेच्या हितासाठी मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं राजकीय आरक्षण असेल यावर आज उठवणार आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचं कारस्थान सुरु आहे. मराठा समाज शिक्षणाचं आरक्षण मागतो, ओबीसी समाज राजकीय आरक्षण मागतो, दोघांची भांडणं नाहीत, दोघं मिळूनच बहुजन समाज आहे. आणि या बहुजन समाजाची वज्रमुठ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी जो दौरा करणार आहे, त्या दौऱ्यात मराठा समाज, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना मिळणार मदत, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि मजूर, महिलांची सुरक्षा हे घेऊन मी दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
या भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छाता अभियानाला पाठिंबा दिला. तसेच गावातील मंदिर, शाळा तसेच रुग्णालये स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
मंदिर, शाळा, रुग्णालये स्वच्छ ठेवण्याचा संकल्प
“मला या धरवतीवरुन संकल्प काय करता असं विचारलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरु केलं. सगळ्या देशात स्वच्छता अभियान राबवलं गेलं. यावेळी एक नवा संकल्प करायचा. आपल्या गावातील प्रार्थनालय स्वच्छ ठेवायची जबाबदारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान म्हणून घ्यायची आहे. भगवानबाबा यांचं मंदिर रोज स्वच्छ ठेवायची आहे. गावातील मंदिर, रुग्णालय तसेच शाळा स्वच्छ ठेवायची आहे,” असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता
तसेच पुढे बोलताना आपल्या देशात प्रार्थनालय, विद्यालय आणि रुग्णालय स्वच्छ नाही. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ही सर्व ठिकाणं स्वच्छ ठेवण्याचं मी आवाहन करतो, असंही पकंजा मुंडे म्हणाल्या.
आज विजयादशमी आणि दसरा आहे. दसऱ्याची भक्ती आणि शक्तीची परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी उन्हा ताणात घरची पुरणपोळी सोडून मैदानात उपस्थित झालात त्याबद्दल नतमस्तक होऊन पाया पडते. तुमच्या प्रेमासमोर माझी झोळी कमी पडतेय. भगवान बाबांची भक्ती आणि लोकनेते गोपीनाथ मुंडेयांची शक्ती ही वैभवाची पंरपरा सुरु ठेवण्याचं श्रेय तुम्हा सर्वांना आहे. आदरणीय महादेवराव जानकर यांनी आताच भाषण केलं. आपल्या लाडक्या खासदार प्रीतम ताईंना भाषण केलं. मंचावर खासदार सुजय विखे पाटील, माझ्या वडिलांचे अत्यंत लाडके कर्डिले साहेब, तीन जिल्ह्यांचे आमदार सुरेश आण्णा धस, प्रविण घुगे, मोहन दादा, मंचावर उपस्थित धोंडे साहेब, नमिता मुंदडा, एवढे नावं घेत बसलो तर बाबा इथेच संध्याकाळ होईल. किती देखणा कार्यक्रम आहे. तुम्ही गप्प बसलात तर माझा आवाज तुम्हाला ऐकू येईल, असं उपस्थित समुदायाला पंकजा मुंडे म्हणाल्या. तुम मुझे कब तक रोकोगे, पंकजा मुंडेंनी शायराना अंदाजात एकप्रकारे पक्षांतर्गत आणि पक्षातील विरोधकांना देखील इशारा दिलाय.
तुम मुझे कब तक रोकोगे
मला वाटलं मी इथे येऊ शकणार नाही. माझ्या मनात चारोळ्या आल्या. तुम मुझे कब तर रोकोगे? जानकर साहेब भाषण करताना इंग्रजीत बोलत होते. ओबीसी माणूस पेटला तर इंग्रजीत बोलतो. मध्येच हिंदी बोलतात. कारण त्यांना देशाची लिडरशीप आहे. तुम मुझे कब तक रोकोगे? मुठ्ठी मे सपने लेकर जेबोमे कुछ आशाए, दिल में अरमान यहीं की कुछ करजाएँ, सूरजसा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझे कबतक रोकोगे? अपनी हद रोषण करने से तुम मुझे कैसे रोकोगे, कैसे टोकोगे?, अशा शायराना अंदाजात पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका भगवानबाबांच्या भक्तांसमोर मांडली. पंकजा मुंडे यांनी या माध्यमातून त्यांच्या विरोधकांना उत्तर दिलंय. मात्र, पंकजा मुंडे यांनी कुणाचंही नाव न घेता टीका केल्यानं पक्षांतर्गत की विरोधी पक्षातील नेत्यांना इशारा दिला आहे.
मुंडे साहेबांच्या काळात लाखो लोक मेळाव्याला यायचे
मला सांगा हा मेळावा होईल का नाही? चर्चा होती. माझ्यावर प्रेम करणारे सांगत होते, ताई मेळावा नको. का रे बाबा? म्हणे, सत्ता नाही. सत्ता नाही म्हणून मेळावा नाही? कधी या मेळाव्याने सत्ता बघितली? मुंडे साहेब सत्तेत होते का? लाखो लोक या मेळाव्याला येत होते.
‘कोणत्या नेत्याची चमचेगिरी करायला फुलं टाकत नव्हते’
मी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या ऐकू आले का तुम्हाला? समोर उपस्थित सर्व वडिलधारे मंडळी, युवा बांधव आणि मातांनो, काय सोहळा आहे, इतका देखणा सोहळा, इतका रांगडा सोहळा, मला नाही वाटत देशामध्ये कुठे होत असेल. हेलिकॉप्टरमधून यायचं आणि बैलगाडीत बसायचं. आहे का असं कुठे? आहे का? मी वरुन फुलं टाकत होते, भगवान बाबा आणि तुमच्या चरणी. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करायला फुलं टाकत नव्हते. मी भगवान बाबांवरच्या श्रद्धेपोटी आणि तुम्ही इथे आलात, तुमच्या भावनेला आदरांजली वाहण्यासाठी फुलं वाहत होते, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांचं नाव न घेता टीका केली.
माझं तुमच्याशिवाय कोण आहे?
बैलगाडीत बसले. ऊसतोड कामगारांचा कोयता होता. ऊस सुद्धा तिथे प्रतिकात्मक होता. पण मला बैलाची भीतीच वाटायची. बैल खवळले तर? ते मला म्हणाले, ताई बैल लई गरीब आहेत. मी म्हणाले, बैल लई गरीब आहेत रे, पण माणसं गरीब नाहीत. बैल जर उधळला तर पंचायत होईल माझी, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
आई जशी मुलाची दृष्ट काढते, तशी मी आता पदर तुमच्यावरुन ओवाळला. जसा पदर तुमच्यावरुन ओवाळून काढला, दृष्ट काढली, तसाच जर वेळ पडला तर जीव सुद्धा तुमच्यावर ओवाळूव टाकल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याशिवाय माझं कोण आहे? आहे का असा नेता जो तुला या खुर्चीच्या मखमलवर बसवतो? आहे का असा राजकीय कुणी? माझा पिता जिवंत आहे का? मग माझं तुमच्याशिवाय कोण आहे? त्यामुळे तुमच्यापुढे जीव ओवाळून टाकेन, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
सामान्य, वंचिताची चळवळ इथून ऊर्जा घेते
मला मुंडे साहेबांनी शिकवलंय आपण ज्या मातीत जन्माला येतो, त्या मातीचा, जातीचा अपमान वाटता कामा नये. जो मोठ्या जातीत जन्म घेतील, राजघराण्यात जन्म घेतो त्यांना सुद्धा गर्व वाटू नये. आणि जो गरीब, बिछड्या जातीत. वंचितांमध्ये जन्म घेतो त्याचीसुद्धा मान खाली जायला नको. यासाठी या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात महामानव डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आज जी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण झालीय त्या परिस्थितीला दिशा देण्यासाठी भक्ती आणि शक्तीची परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मताचं राजकारण नाही. सामान्य, वंचिताची चळवळ इथून ऊर्जा घेते. छोटीची ज्योत ही मोठी मशाल बनून पूर्ण राज्याच्या कान्याकोपऱ्यात जाते.