राजकारणात आता माणुसकी राहिलेली नाही हे दुदैव -खा. सुप्रियाताई सुळे
मुंबई ,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राजकारणात आता माणुसकी राहिलेली नाही हे दुदैव आहे. एक काळ असा होती की, राजकारणात माणुसकी जिवंत होती जी आता केंद्र सरकारने पूर्णपणे संपवून टाकली आहे, असा संताप खा. सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला.
आज हुतात्मा चौक, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले. यावेळी सुप्रियाताईंनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्र्याच्या मुलाने लोकांची हत्या केली त्याविरोधात आम्ही उभे राहिलो आहोत. ही घटना अत्यंत दुदैवी आहे. तो व्हिडीओ बघितला की अंगावर शहारे येतात आणि मस्तकात आग जाते. इतका क्रूरपणा कधी पाहिलेला आहे का? या क्रूर घटनेचा केवळ जाहीर निषेध करून संपणार नाही तर आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे. त्याला अटक होण्यासाठी इतका वेळ लागला. खरं तर केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा, असे मत सुप्रियाताईंनी व्यक्त केले.
लखीमपुर खीरी इथे झालेली शेतकरी हिंसा ही सत्तेची मस्ती आहे. घटनेचा व्हिडीओ पाहिल्यास तुम्हाला त्यात माणुसकी दिसते का? सरकार कोणाचेही असू दे, उत्तर प्रदेशमध्ये जी कृती झाली ती निंदाजनकच आहे. मी समाजकारण करते, तुम्ही पत्रकार आहात, पण आधी आपण माणूस आहोत. घडलेले कृत्य चुकीचे आणि क्रूर असल्याचे तुम्हाला वाटत नाही का? असा सवाल त्यांनी माध्यम प्रतिनिधींना केला.
केंद्र सरकारने भारताच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका खा. सुप्रियाताई सुळे यांनी मांडली. आजच्या बंदला हिंसक वळण लागले आहे असे वृत्त कळले. हे नक्की कोणाचे काम आहे याची आम्ही माहिती घेऊ. आम्हीच आमच्या बस का फोडू? याचा अर्थ कोणीतरी चुकीचे काम करत आहे. तरी चुकीच्या बातम्या पसरवण्यात येऊ नये, अशी विनंती सुप्रियाताईंनी पत्रकारांना केली.देशात मुघलांचे राज्य सुरू आहे, त्यांच्या संस्कृतीत महिलांचा मान-सन्मान दिसत नाही. त्यामुळे त्यांना असे वाटते की, या देशातील महिला अबला आहे. ‘उन्होंने घी देखा है, बड़गा नही देखा’… याच महाराष्ट्रातील मुली मग त्या सावित्रीबाई असो अहिल्याबाई असो किंवा राणी लक्ष्मीबाई असू दे, त्याचे कर्तृत्व केंद्र सरकार विसरले आहे. म्हणून ते महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली. महाराष्ट्राच्या लेकी त्यांच्या अत्याचारासमोर ताकदीने उभ्या राहतील, कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृह राज्यमंत्री दोषी-नवाब मलिक
उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली. या निर्घृण हत्येच्या मागे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा हात असल्याचे समोर आले. मात्र या घटनेनंतरही गुन्हा दाखल करण्यास सरकार तयार झाले नाही. दबाव निर्माण झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला. या सर्व घटनाक्रमात केंद्रीय गृह राज्यमंत्री दोषी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. हुतात्मा चौक, मुंबई येथे पक्षातर्फे केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारने तात्काळ अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरुन बरखास्त करायला हवे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र बंदला महाराष्ट्र विकास आघाडीसोबतच इतर अनेक राजकीय पक्षांनी, कामगार- व्यापारी-दुकान संघटना, ट्रेड युनियनयांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा बंद यशस्वी ठरला आहे. मात्र राज्यात शांततेत हा बंद सुरु असताना काही ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली हे योग्य नसल्याचे नवाब मलिक म्हणाले. राज्यातील बंद शांततेत पाळला जात असताना कोणत्याही हिंसक कृत्याला आमचे समर्थन नाही, तसेच अशाप्रकारची हिंसा होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर
लखीमपुर खीरी येथे शेतकर्यांविरोधात झालेल्या अमानवीय हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने राज्यात महाराष्ट्र बंद पुकारला आहे. धायरी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बंदमध्ये सहभाग घेत भाजपाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध व्यक्त केला.