नाकर्त्या ठाकरे सरकारचा शेतकरी द्रोही चेहरा उघड -भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांची टीका

औरंगाबाद, ४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-
मागील दोन वर्षांपासून केवळ खोटी आश्वासने देत जनतेस झुलवत ठेवणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले असून अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकऱ्यास अद्यापपर्यंत कवडीचीही मदत न देता पाठ फिरविणारे ठाकरे सरकार हे शेतकरी विरोधी नव्हे,तर शेतकरी द्रोही आहे,असा घणाघाती आरोप करीत भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सोमवारी ठाकरे सरकारच्या शेतकरी द्रोही कारवायांचा पाढाच माध्यमांसमोर उघड केला.

मागील दोन वर्षांत महाराष्ट्रावर असंख्य नैसर्गिक आपत्ती कोसळल्या.कोरोनासारख्या महामारीत बेपर्वाईमुळे अनेक निष्पाप जिवांचे बळी गेले.टाळेबंदी जाहीर केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांना मदतीची घोषणा करून त्यांच्या तोंडाला सरकारने पानेच पुसली.निसर्ग चक्रीवादळात पुरता उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांस मदत देण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नंतर त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही,उलट मदत मिळाली किंवा नाही याचाही थांगपत्ता नसल्याची कबूली देऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांची एकप्रकारे घोर थट्टाच केली आहे.दुसऱ्या टाळेबंदीत रोजगार बुडालेल्या हजारो कुटुंबांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे बोटे दाखवत नाकर्त्या ठाकरे सरकारने ती जबाबदारी देखील टाळली आहे.नंतरच्या तौक्ते चक्रीवादळात केवळ धावता दौरा करून मदतीचे गाजर दाखवत परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी या वादळग्रस्तांनाही वाऱ्यावर सोडले आणि आता अतिवृष्टीच्या भीषण संकटात सापडून,ऊस,सोयाबीन,कापूस आदी पिकांच्या हानीमूळे सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांविषयी साधी सहानुभूतीदेखील न दाखविता नियमांच्या कागदावर बोटे नाचवत दाखवत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू आहे असा आरोप भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला.

शाब्दिक फुंकर मारून संकटग्रस्तांचे आश्रू पुसण्याचा कांगावा करताना आपली कातडी बचावण्यासाठी केंद्र सरकारकडे बोटे दाखविणाऱ्या ठाकरे सरकारचा मुखवटा उघडा पडला असून सरकारचा खरा चेहरा शेतकरी द्रोहीच आहे असे कुलकर्णी म्हणाले.कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी खोटी आश्वासने देऊनही आता पाच महिने उलटून गेले.वादळग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी अजूनही वाऱ्यावरच आहे आणि आता अतिवृष्टीग्रस्तांची भर पडली आहे.शेतकरी जेव्हा संकटात भरडला जात होता,तेव्हा हे मुख्यमंत्री राज्यातील जनतेस तिसऱ्या लाटेची भीती दाखवून घरात डांबून ठेवण्यासाठी धडपडत होते.अन्यायाविरूद्धचा जनतेचा संताप दाबण्यासाठीच हे कारस्थान होते असा आरोपही राज्य प्रवक्ते कुलकर्णी यांनी केला.राज्यातील महिलांवर अन्याय-अत्याचार झाले,भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आणि आज शेतकरी देशोधडीला लागला,ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही नाकर्तेपणा सध्या शिगेला पोहोचला असे ते म्हणाले.कोरोनाची ढाल पुढे करून स्वतःचा बचाव करणारे व जनतेला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे ठाकरे सरकार महाराष्ट्र द्रोही आणि शेतकरी द्रोही आहे याचा पुनरूच्चार करून,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत भाजपचा संघर्ष हा सुरूच राहील असा इशारा भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिला.