​लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी:पालकमंत्री अमित देशमुख यांनी ग्रामस्थांना दिला धीर

रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशमुख येथील भारत रणदिवे आणि ओमप्रकाश जोशी मांजरा नदीच्या पाण्यात अडकल्याची माहिती रेणा कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे यांनी दिली होती. त्याठिकाणी ताबडतोब आपत्ती निवारण टीमला पाठवून या दोघांनाही सुखरूपपणे बाहेर काढले आहे.या टीमचे कार्य कौतुकास्पद आहे.

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने लातूर येथे दाखल झालेल्या पालकमंत्री अमित देशमुख यांनी प्रारंभी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत बैठक घेतल्यानंतर सायंकाळी लातूर तालुक्यातील टाकळी येथे जाऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून करण्यात येत असलेल्या बचाव व मदत मोहिमेची माहिती घेतली. पथकातील सदस्यांना प्रोत्साहन दिले, शिवाय ग्रामस्थांनाही धीर दिला. 

काळजी करु नका, धीर धरा….आपणाला सुरक्षित घेऊन येण्यासाठी पथक येत आहे 
एकुण परिस्थीतीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर तालुक्यातील टाकळी, सारसा तसेच रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव, डिघोळ देशमुख येथील शेतवस्तीवर पुराच्या पाण्यामुळे अडकुन पडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यंत्रणा राबविण्याचे निर्देश दिले. या वेळी त्यांनी पोहरेगाव येथील श्री नागोराव तर टाकळी येथील श्री भागवत ऊफाडे, श्री बाबुराव बिराजदार या शेतकऱ्यांशी विजय देशमुख यांच्या मोबाईलवरुन संपर्क साधला.आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आपल्याला घेऊन जाण्यासाठी येत आहे असे सांगुन काळजी करु नका, धीर धरा आम्ही आपल्या मदतीसाठी आहोत, अशा शब्दात त्यांना धीर दिला. 

मांजरा प्रकल्पाच्या क्षेत्रातील पाऊस कमी झाल्याने आवक (inflow) कमी झाली आहे. त्यामुळे पुढील दीड तासात १८ दरवाजे पैकी ६ दरवाजे ३ मी उंचीने चालू ठेवून उर्वरित *१२ दरवाजे बंद करण्यात येत आहेत .

Image

मांजरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने टाकळी येथील काही शेतकरी शेतवस्तीवरच अडकले आहेत. त्यांच्या चोहोंबाजुनी पाण्याने वेढा दिल्यामुळे त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाच्या वतीने मोहिम राबविण्यात येत आहे. सांयकाळी अंधार असतानाही मोठी जोखीम पत्करुन हे पथक कार्यवाही करत आहे. या पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हाधिकारी श्री बी.पी.पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री अभिनव गोयल इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह सांयकाळी टाकळी येथे पोहचले.

Image

पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना धीर दिला. काळजी करु नका, आपल्या मदतीसाठी बचाव पथक येत असल्याचे सांगितले. पथकातील सदस्यांना वैयक्तीरित्या भेटून पालकमंत्र्यांनी त्यांचे कौतूक केले. मांजरा नदीचे पाणी टाकळी गावातील काही वस्त्यापर्यंत पोहचले आहे. त्या ठिकाणी जाऊन पालकमंत्री देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांना धीर दिला. तहसिलदार श्री स्वप्नील पवार यांना त्या ठिकाणी थांबण्यास सांगुन मदत कार्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. यावेळी पोलिस अधिक्षक श्री निखील पिंगळे, उपविभागीय अधिकारी श्री सुनिल यादव, तहसिलदार श्री तहसिलदार श्री स्वप्नील पवार, लातूर पंचायत समिती उपसभापती श्री प्रकाश ऊपाडे, श्री विजय देशमुख, टाकळी ब. चे सरपंच, श्री बापु सोट, श्री वसंत उपाडे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते