राज्यातील कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यासाठी नियोजन करण्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

कापूस खरेदी नियोजनाबाबत आढावा बैठक

मुंबई, २२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-राज्यातील हंगाम २०२१-२२ मधील कापूस खरेदीचे योग्य नियोजन करून शेतकरी हितासाठी कापूस खरेदीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात करावी त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

हंगाम २०२१-२२मधील कापूस खरेदी नियोजनाबाबत सहकार व पणन मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.

राज्यात खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये ३९.३७ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झालेला आहे. मागील वर्षी ४२.०८ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झालेला होता. यावर्षी कापूस पेरा  ६.४४ टक्के घटला असली तरी  सद्यस्थितीत कापूस पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. त्यानुसार राज्यात ८०-८५ लाख गाठी एवढे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार योग्य नियोजन करून खरेदीकेंद्र नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत करावी आणि या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावेत, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

ज्या तालुक्यात सर्वाधिक कापूसपेरा आहे तिथे प्रत्यक्ष खरेदी लवकर सुरू करण्यासाठीचे नियोजन करावे. शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य नियोजन करून कापूस खरेदी करावी, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे संचालक सतीश सोनी, सीसीआयचे जनरल मॅनेजर अतुल काला, संजय पाणीग्रही व संबंधित अधिकारी उपस्थित होते.