राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 488 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करणार- प्रा. वर्षा गायकवाड

मराठवाड्यातील निजामकालीन शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर बांधणीसाठी 200 कोटी रुपयांची तरतूदशालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड 

हिंगोली,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबाद  मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या  संपूर्ण आयुष्याची आहुती देत हैदराबादला निजामांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी दिलेल्या लढ्याचे मोल अमूल्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केले.

Image

हैदराबाद  मुक्ती संग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री  प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतरही देशात तीन संस्थाने विलीन झाली नव्हती. काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद या संस्थानांनमुळे भारतीय संघराज्य पुर्णत्वास गेले नव्हते. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात तसेच मराठवाड्याच्या गावा-गावातून हैदराबाद  मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. तरीही निजाम शरण येत नसल्याचे पाहून हैदराबाद  मुक्तीसंग्रामाचे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिल्याने अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी  निजामाच्या जोखंडातून हैदराबाद  मुक्त झाला, असे पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

Image

मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या  संपुर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाड्यातील सर्व जिल्हे निजामांच्या जोखडातून मुक्त केले. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला, तो सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. त्याची जाणीव ठेऊन मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक व कृषि विषयक सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्याची आवश्यकता असल्याचेही पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यावेळी म्हणाल्या.

            पालकमंत्री वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर येऊन 8 हजार 919 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून 22 घरांची पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही सुरु आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  तसेच अतिवृष्टी आणि पुर परिस्थितीत दुर्दैवाने प्राण गमवावे लागलेल्या 07 लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 04 लाख  रुपयाची सानुग्रह मदत देण्यात येत आहे. यापैकी 03 मयत लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 04 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली असून उर्वरीत 04 मयत लोकांच्या कुटुंबियांना मदत देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियाना अंतर्गत प्रथम टप्प्यात मराठवाड्यातील निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर बांधणीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये 718 शाळांच्या 1 हजार 623 वर्ग खोल्यांची पुनर बांधणी करण्यात येणार आहे. तर 1050 शाळांची मोठी दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी एकूण 200 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. तसेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने प्रथम टप्प्यात 488 शाळांचा विकास करण्यास मान्यता दिली आहे. यात शासकीय निधी शिवाय सीएसआर निधी, लोकसहभाग आणि ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रीकरण करुन शाळांचा विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Image

नर्सी येथील संत नामदेव महाराज तिर्थक्षेत्राची विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाने 15 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. लवकरच कामांना प्रारंभ केला जाणार असून लसीकरणासाठी जिल्ह्याला आतापर्यंत एकूण 4 लाख 90 हजार 560 लसी प्राप्त झाल्या असून जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी 88 केंद्र कार्यान्वित करण्यात आली. त्यानुसार 4 लाख 46 हजार 484 लसी देण्यात आल्या असुन 25 हजार 432 लसी उपलब्ध आहेत. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांतून सध्या हिंगोली जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. कोरोनासाठी लसीकरण सुरु झाले असले तरी अजून धोका आणखी टळलेला नाही. यासाठी आवश्यक सुचनांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी हिंगोली जिल्हा सज्ज आहे. हिंगोली जिल्ह्याने धैर्याने आणि संयमाने कोरोनाचा मुकाबला करत राज्यात आपला एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यातील जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.    

प्रारंभी पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन  हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली.यावेळी  उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणवीरकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांच्यासह  पत्रकार,  नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.