तरुण पिढीने जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य बजवावे – क्रीडा मंत्री सुनिल केदार

तरुण पिढीने जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य बजवावे – क्रीडा मंत्री सुनिल केदार

नागपूर ,१५ सप्टेंबर /प्रतिनिधी :-स्वातंत्र्य समरात अनेक लोकांना हौतात्म्य पत्करावे लागले. अनेक पिढ्यांना त्याग करावा लागला. त्या त्याग व बलिदानाची आजच्या पिढीने आठवण ठेवावी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आजच्या तरुण पिढीने  जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावण्याची प्रतिज्ञा करण्याचे आवाहन पशुसंवर्धन, दुग्ध विकास व्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज केले.

हिंगणा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)च्या परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक प्रशान्त जांभुळकर, कमांडंट सुभाष चंद्र, संतोष मिश्रा, कमांडंट करुणा राय, जनसंपर्क अधिकारी प्रदीप द्विवेदी यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीआरपीएफच्यावतीने कन्याकुमारी ते राजघाट या दरम्यानच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून कन्याकुमारीवरून 22 ऑगस्ट रोजी ही सायकल रॅलीची सुरुवात झाली आहे.

May be an image of 4 people and people standing

यावेळी आलेल्या सायकल रॅलीचे स्वागत श्री. केदार यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये हैदराबादवरून साधारणत: 580 किलोमीटरचे अंतर कापून ही 30 सायकलपटूंची रॅली आज सायंकाळी नागपुरात दाखल झाली. यात सहभागी अपंग व महिला सायकलपटूंचे कौतुक करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये स्वराज्य गर्जना ढोल पथकाच्यावतीने ढोल ताशाचे सादरीकरण करण्यात आले. तर नेहरू युवा केंद्राच्या वतीने देशभक्तीपर गितावर आधारित नृत्य सादर करण्यात आले. केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीही नृत्य सादर केले.

यावेळी सीआरपीएफ उपमहानिरीक्षक प्रशांत जांभूळकर यांनी स्वागतपर भाषण केले. यामध्ये त्यांनी या आयोजनाबाबत विस्तृत माहिती दिली. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात गृह मंत्रालयाच्यावतीने सूचनेनुसार वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. देशाच्या अखंडता व एकतेचा संदेश देशांमध्ये देणे, हा या रॅलीचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.