भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात रंगला कलगीतुरा

मुंबई ,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील आणि ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांच्यात  कलगीतुरा रंगला आहे. रस्ते घोटाळा प्रकरणात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.”आपण असल्या धमक्यांना घाबरत नाही, रस्ते विकासासाठी आपण राबवलेल्या कल्पक प्रकल्पाची खुशाल चौकशी करा”, असे प्रत्युत्तर भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

 रस्तो घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी हायब्रीड अॅम्युनिटी रोड बांधकामामध्ये जो भ्रष्टाचार केला आहे, त्याविरुद्ध कायदेशीर सल्ला घेऊन एफआयआर दाखल करणार आहे, राज्यातील 90 टक्के रस्ते बंद आहेत. कंत्राटदार पळून गेले आहेत. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन अँटी करप्शनमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू, असा इशाराही हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

धमक्यांना घाबरत नाही, खुशाल चौकशी कराभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रत्युत्तर

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण बाहेर काढल्यावर हडबडलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याला वादात ओढले आहे. पण आपण असल्या धमक्यांना घाबरत नाही, रस्ते विकासासाठी आपण राबवलेल्या कल्पक प्रकल्पाची खुशाल चौकशी करा, असे प्रत्युत्तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

ते सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी अभ्यास करून हसन मुश्रीफ यांचा आर्थिक घोटाळा बाहेर काढला व संबंधित यंत्रणांकडे तक्रार केली. आता मुश्रीफ यांनी चौकशीला सामोरे जावे. त्यांनी काही गैर केले नसेल तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही. पण ते धमक्या देत आहेत. त्यांनी किरीट सोमय्या यांना खटला दाखल करण्याची धमकी देतानाच आपल्यालाही वादात ओढले आहे.

त्यांनी सांगितले की, आपण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना हॅम हा रस्ते विकासाचा अनोखा प्रकल्प सुरू केला. त्यामुळे राज्यात चांगली रस्तेबांधणी झाली व त्या प्रकल्पांची उद्धाटने करून महाविकास आघाडी सरकारचे नेते श्रेय घेत आहेत. आता किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर अचानक हसन मुश्रीफ आपण राबवलेल्या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून चौकशीची धमकी देत आहेत. आपण असल्या धमक्यांना घाबरत नाही, खुशाल चौकशी करा.

ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गेले 19 महिने हसन मुश्रीफ यांना या हॅम प्रकल्पाबद्दल कोणतेच प्रश्न पडले नाहीत. पण त्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार झाल्यानंतर ते रस्ते प्रकल्पाच्या चौकशीबद्दल बोलत आहेत.

ते म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा व संबंधित पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू करण्याचे ठरवले आहे. या जागा आता खुल्या असल्या तरीही त्या मूळच्या ओबीसींच्या असल्याने भाजपाने सर्व जागांवर ओबीसी उमेदवार दिले आहेत.