महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला निवडणूक

नवी दिल्ली,९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त असलेल्या एका जागेसाठी 4 ऑक्टोबर 2021 रोजी निवडणूक होणार असून 22 सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, आसाम, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमधून राज्यसभेवर रिक्त झालेल्या एकूण सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .

खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे १६ मे २०२१ पासून महाराष्ट्रातून राज्यसभेची  जागा रिक्त  झाली आहे. या जागेसह राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी 4 ऑक्टोबर 2021 ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

…असा आहे निवडणूक कार्यक्रम

या निवडणुकांसाठी १५ सप्टेंबर रोजी  निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारिख असून २३ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार. २७ सप्टेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून  सायंकाळी ५ वाजता मतमोजणी  होऊन निकाल जाहीर होणार आहे. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.