इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पैनगंगा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावेत

हिंगोली ७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- पैनगंगा नदीवरील इसापूर धरण दि. 7 सप्टेंबर, 2021 पर्यंत 90.10 टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी 439.98 मीटर आहे. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशय पाणी पातळीत वाढ होत आहे.

पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाचा मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार दि. 15 सप्टेंबर, 2021 पर्यंत 440.85 मीटर ठेवावी लागणार आहे. धर सुरक्षिततेच्या दृष्टीने इसापूर धरणातून वक्रदाराद्वारे कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरिक्त पाणी पेनगंगा नदीपात्रात सोडावे लागेल. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवित व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1, नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

हिंगोली, (जिमाका) दि. 07 भारतीय हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत झालेला जोरदार पाऊस, येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर धरणाची पाणी पातळी आणि पूर्णा, पैनगंगा आणि कयाधू नदीची तसेच लहान , मोठ्या ओढ्यातून वाहत असलेले पाणी यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या पावसामुळे कयाधू, पूर्णा व पैनगंगा नदी तसेच जवळील नाले, ओढे काठच्या गावांना पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावांसाठी खालीलप्रमाणे उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

काय करावे :१) गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा होण्याची शक्यता असल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.२) गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तहसील, पोलीस, नगर पालिका प्रशासनास कळवावे.३) गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.४) पूर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावेत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जावे.५) पूर स्थिती असेपर्यंत पाळीव प्राणी, जनावरे उंच ठिकाणी बांधण्यात यावीत. चुकूनही पाळीव प्राणी, इतर जनावरे यांना नदी काठी, ओढ्या काठी बांधू नये. ६) कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्या.७) पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरुन जाऊ नका, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

काय करु नये :१) पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका.२) पुराच्या पाण्यात चुकूनही जावू नका, तसेच पूर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका.३) दूषित, उघड्यावरील अन्न पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.)४) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत तारांना स्पर्श करु नका.५) पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरिचीत व खोल पाण्यात जाऊ नका.६) पूर परिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण इत्यादी ठिकाणी विनाकारण गर्दी करू नका.