नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
औरंगाबाद,१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- सोमवार रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तर जळगाव च्या चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच नेमकी किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर येईल त्यानंतर मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील असे स्पष्ट करीत नुकसानग्रस्तांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
ढगफुटी सदृश्य पावसामुळे कन्नड, सोयगाव तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे झालेल्या नुकसानीची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज ( दि.1 ) रोजी पाहणी करून येथील नुकसानग्रस्तांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंग चव्हाण,माजी आमदार नितीन पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे , केतन काजे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वरकड आदी अधिकारी उपस्थित होते.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाने सज्ज राहून खबरदारी घ्यावी , कन्नड घाटातील कोसळलेल्या दरड हटवून या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करावी, सिंचन प्रकल्पाच्या झालेल्या नुकसानीच्या दुरुस्ती साठी तात्काळ प्रस्ताव सादर करावे, अतिवृष्टी झालेल्या मंडळात आरोग्य विभागाने देखील दक्ष राहण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या अतिवृष्टी मध्ये कन्नड तालुक्यातील भिलदरी तलाव फुटून येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पाहणी दरम्यान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भिलदरी गाव ते भिलदरी तलाव असा जवळपास 5 किलोमीटर दुचाकीने प्रवास करत पाहणी केली.
भिलदरी तलावाचे झालेल्या नुकसणीची दुरुस्ती करण्यासाठी तात्काळ पंचनामे करावे यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.
अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
कन्नड-चाळीसगाव औट्रम घाटात नुकसान
कन्नड तालुक्यातील महसूल मंडळांपैकी 7 मंडळाचा अतिवृष्टी झाली.अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी यांनी नागद, सायगव्हाण, भिलदरी येथील भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अतिवृष्टीने कन्नड-चाळीसगाव औट्रम घाटात मोठ्याप्रमाणात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली, नागरिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि घाटातील भूस्खलनामुळे उद्भवलेल्या स्थितीची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 31 ऑगस्ट रोजी पाहणी केली.
पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी चव्हाण यांच्यासमवेत आमदार उदयसिंह राजपूत, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड आदीची उपस्थिती होती. घाटाची पाहणी करताना अडकलेल्या नागरिकांना तत्काळ बाहेर काढावे. वाहतूक कोंडी तत्काळ सोडवावी, अशा सूचना संबंधितांना दिल्या.
परिसरातील वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी पर्यायी बोगदा निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करणार असल्याचे ही श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच घाटातील तपासणी नाका खुला करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पिशोर येथील गोसावी वाड्याची पाहणी
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गोसावी वाड्यामध्ये परिसरातील मूळ नाल्यांवर लोकांनी अधिकृत बांधकामामुळे वस्तीत नाल्याचे गलिच्छ पाणी साचत आहे ग्रामंस्थाना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या अनधिकृत बांधकामाची सखोल चौकशी करुन ते हटवण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.
पूरग्रस्तांशी संवाद
कन्नड तालुक्यातील भीलदरी धरण फुटल्याने भोवतालची शेतातील पिके उद्धवस्त झाली या शेताचीही जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या भेटी घेत जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या व्यथा जाणून, तुम्ही एकटे नसून शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. नुकसानीचे गावनिहाय पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
नागद येथे पाहणी
नागद येथील दुकानांची पाहणी करत पूरग्रस्त व्यावसायिकांना धीर दिला. घराचे नुकसान झाले अथवा घरात पाणी शिरले अशा परिवारांची भेट घेत त्यांनी वस्तूस्थिती जाणून घेतली. पंचनाम्यांचे आदेश काढले असून लवकरात लवकर मदत पोहचवू असे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.