गंभीर अवस्थेतील रूग्णांसाठी वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित रूग्णालयात विशेष उपचार यंत्रणा उभाराव्यात – अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन

कोरोना रूग्णसंख्येतील किंचित वाढ चिंता वाढवणारी; संभाव्य तिसरी लाट प्रभावहीन ठरविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे

 आगामी महिन्यातील सणवार दक्षता घेऊन साजरे करावेत

मुंबई,२८ ऑगस्ट /प्रतिनिधी :- सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णसंख्येत होत असलेली किंचित वाढ चिंता वाढवणारी आहे. ही वाढ अधिक तीव्र होऊन ती तिसऱ्या लाटेचे रूप धारण करेल अशी शक्यता आणि भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही संभाव्य तिसरी लाट प्रभावहीन ठरावी किंवा तिची तीव्रता कमी राहावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सजग राहावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. शिवाय नागरीकांनीही यासंबंधाने असलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

मागच्या काही दिवसात भारतातील एकूण कोवीड१९ बाधित रूग्णसंख्सेत वाढ झाल्याचे दिसून आले असून यात केरळसारख्या राज्यातील वाढ लक्षणीय आहे. या संदर्भाने ना. अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात हळूहळू कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. आगामी काही दिवसात ही रूग्णसंख्या अधिक गतीने वाढून ती तिसऱ्या लाटेचे रूप धारण करेल अशी भीती तज्ज्ञ मंडळी व्यक्त करीत आहेत. या सर्व तज्ञ मंडळींचा हा इशारा लक्षात घेता लातूर जिल्ह्यातील आणि संपूर्ण राज्यातीलच प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जनतेने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे. त्याच बरोबर या संदर्भाने लागू असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

गर्दीत जाणे / प्रवास करणे टाळावे

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लॉकडाऊन नियमात शिथीलता आणल्यामुळे बहुतांशी औद्योगिक, व्यापारी प्रतिष्ठाने आणि बाजार सुरू झाले आहेत, असे असले तरी संभाव्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन यासर्व ठिकाणी कोवीड१९ मार्गदर्शक सूचनांचे कटाक्षाने पालन होणे गरजेचे आहे. कोणत्याच ठिकाणी गदी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. या संदर्भाने प्रशसनाने विशेष लख देणे गरजेचे आहे. शारीरिक आंतर पाळणे, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करणे या बाबतीत जनतेने विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, शक्यतो गर्दीतील संपर्क टाळावा, वृध्द आणि ज्येष्ठ नागरिक, लहान मुले घरीच राहतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही ना. अमित देशमुख यांनी केले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना सूरू ठेवाव्यात

रूग्ण संख्येत होणारी वाढ आणि तज्ज्ञ मंडळींचा इशारा लक्षात घेऊन लातूर जिल्हयासह प्रशासन, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद, महापालीका, नगरपालीका इतर संस्था आणि आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून कोणत्याही ठिकाणी कोणत्याच परिस्थितीत गर्दी होणार नाही याची दक्षता घेतानाच अशा सार्वजनिक ठिकाणी शारिरीक आंतर पाळले जाईल, मास्क सॅनिटायझर वापर होईल याचे नियोजन करावे. त्याच बरोबर सर्व प्रकारच्या इतरही प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू कराव्यात, उपचाराच्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात असे निर्देशही संबंधितांना श्री. देशमुख यांना दिले आहेत.गंभीरातील गंभीर परिस्थिती उद्भवली तरी सर्वांना वेळेत चांगले उपचार मिळतील यासाठी जिल्हा रूग्णालये, ग्रामिण रूग्णालये व इतर रूग्णालयाच्या ठिकाणी वाढीव बेड, औषधे, उपकरणे उपलब्ध करून ठेवावीत, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर याची कमतरता भासणार नाही याचे नियोजन करावे. प्रगतिपथावर असलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयावर महत्त्वपूर्ण जबाबादारी

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी रूग्ण सेवेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता रूग्णांच्या उपचारासाठी महाविद्यालयाशीं संलग्नित रूग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्या रूग्णालयांना आणखी काही सुविधा मनुष्यबळ हवे असल्यास त्या संबंधी अधिष्ठातानी तातडीने मागणी नोंदवावी त्याची पूर्तता तात्काळ केली जाईल. गंभीर अवस्थेतील रूग्णांसाठी वैदयकीय महाविदयालय सलग्नीत रूग्णातयालत विशेष उपचार यंत्रणा उभाराव्यात, लवकरात लवकर रूग्णांची तपासणी होईल यादृष्टीने प्रयोगशाळेची क्षमता वाढवून घ्यावी, बेडची संख्या वाढवावी सर्व बेड ऑक्सिजनेटेड असावेत यादृष्टीने काळजी घ्यावी. तिसऱ्या लाटेत लहानमुलांना अधिकचा धोका सांगितला असल्यामुळे यासाठी स्वतंत्र आणि सर्व आवश्यक सुविधसह उपचार कक्ष उभारले जावेत असे निर्देशही  मंत्री श्री. देशमुख यांनी दिले आहेत.