महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचे दुःखद निधन

सोलापूर ,२६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी सुपुत्र महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूर येथील शाहूपुरी तालमीत अनेक वर्षे सराव करत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कुस्तीत चांगला ठसा उमठवला होता. 1992 साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेल्या आप्पालाल शेख यांनी 1991 साली न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकूल गेम स्पर्धेत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले होते.

महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इब्राहिम अल्काझी यांना श्रद्धांजली

मुंबई: सोलापूरचे प्रसिद्ध मल्ल महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून उदयोन्मुख कुस्तीपटूंचा प्रेरणास्त्रोत आज काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी पैलवान अप्पालाल शेख यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, पैलवान अप्पालाल यांचा जन्म मल्लविद्येची मोठी परंपरा असणाऱ्या दक्षिण सोलापूरच्या बोरामणी गावातील शेख कुटुंबात झाला. कुस्ती परंपरेशी एकरुप झालेल्या शेख कुटुंबातील तिघाजणांनी महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे. न्यूझीलंड येथे 1991 साली झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत अप्पालाल शेख यांनी सुवर्णपदक जिंकत देशाचे नाव उंचावले होते. पैलवान अप्पालाल शेख यांनी त्यांच्या जीवनात अनेक नामवंत मल्लांचा पराभव करत कुस्तीची मैदानं गाजवली. त्यांच्या निधनानं राज्याच्या कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.