श्रीकृष्णदेवराय यांच्यासारख्या महान राजांच्या कथा तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत – उपराष्ट्रपती
युवकांना आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देण्याच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी भर दिला
उपराष्ट्रपतींनी हम्पी या युनेस्को जागतिक वारसा स्थळाला भेट दिली
नवी दिल्ली ,२१ ऑगस्ट /प्रतिनिधी :- उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी युवकांना आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की श्री कृष्णदेवराय यांच्यासारख्या महान राजांच्या कथा आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ठळकपणे समाविष्ट केल्या पाहिजेत, जेणेकरून तरुण पिढीला प्रेरणा मिळेल.
कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील पूर्वीच्या विजयनगर साम्राज्यातील प्रसिद्ध शहर हम्पीला भेट दिल्यानंतर, एका फेसबुक पोस्टमध्ये, उपराष्ट्रपती म्हणाले की, हे ऐतिहासिक स्थळ आपल्याला आपल्या समृद्ध आणि जाज्वल्य भूतकाळाची आठवण करून देते.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या भव्यतेची आणि महानतेची प्रशंसा करताना नायडू म्हणाले की, या ऐतिहासिक तीर्थक्षेत्रामुळे त्यांना आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टी आणि कौशल्याबद्दल अभिमानाची भावना दाटून आली .
1336 मध्ये कृष्णा आणि तुंगभद्र नदी खोर्यातील प्रदेशात हरिहर राय पहिला आणि बुक्का राय पहिला या दोन भावांना विजयनगर साम्राज्याची स्थापना केली . त्यानंतर शक्तिशाली राजा श्री कृष्णदेवरायांच्या कारकीर्दीत या साम्राज्याने सुवर्णकाळ गाठला होता. या काळात,येथुन जगभरात व्यापाराचा विस्तार झाला आणि संगीत, नृत्य, साहित्य, चित्रकला, शिल्पकला आणि वास्तुकला यासारख्या क्षेत्रांनी ही राजाश्रयाने एक नवीन उंची गाठत या काळाचा एक अमिट ठसा सोडला.
काल हंपी येथे आगमन झाल्यावर उपराष्ट्रपतींनी आज विरुपाक्ष मंदिर, पवित्र स्थान गरुड (पाषाण रथ) गणेश मंदिर , लोटस महाल आणि हजार राम मंदिर यासह विविध स्थळांना भेटी दिल्या.
त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह विरुपाक्ष मंदिरात प्रार्थना केली.यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी हम्पी जागतिक वारसा स्थळाच्या विविध पैलूंची त्यांना माहिती दिली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या ठिकाणी केलेल्या चांगल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.