राज्यात दुसरी लाट नियंत्रणात,राज्यात ५ हजार १३२ नवीन कोरोनाबाधित

मुंबई ,१८ऑगस्ट /प्रतिनिधी :- राज्यात आज दिवसभरात ८ हजार १९६ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत, तर ५ हजार १३२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, आज १५८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. कोविड साथरोग आटोक्यात आणण्यासाठी राज्याने केलेल्या आरोग्यविषयक उपाययोजना व नागरीकांचे सहकार्य याचा परिणाम म्हणून राज्यात दुसरी लाट नियंत्रणात आलेली आहे.

  • शून्य रुग्ण – आज रोजी नंदूरबार जिल्हयात एकही कोविड सक्रिय रुग्ण नाही.
  • दहापेक्षा कमी रुग्ण – राज्यातील धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या सहा जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी आहे.
  • शंभरपेक्षा कमी रुग्ण – राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे.
  • सद्यस्थितीत जास्त रुग्णसंख्या असलेल जिल्हे सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग.
  • राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर (Positivity rate) २.४४ टक्के इतका आहे.
  • राज्यात गत काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरी या शहरातील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापि, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्ह्यांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.

१७ ऑगस्ट २०२१ अखेरची सक्रिय रुग्णसंख्या

o आजपर्यंत बाधित झालेले एकूण रुग्ण –  ६४ लाख १ हजार २१३.

o बरे झालेले रुग्ण –  ६२ लाख १ हजार १६८.

o एकूण मृत्यू – १ लाख ३५ हजार २५५

o सक्रिय रुग्ण संख्या – ६१ हजार ३०६.

o रुग्ण बरे होण्याचा दर – ९६.८७ टक्के.

लसीकरण सद्यस्थिती :

  • राज्यात आजघडीला पाच कोटी सात लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक डोस देण्यात आलेले आहेत.
  • राज्यातील ४५ वयोगटावरील जवळपास ५० टक्के नागरीकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. १८ ते ४४ वयोगटातील जवळपास २५ टक्के नागरिकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. राज्यातील एक कोटी तेहतीस लाख सात हजार नागरीकांना कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या आहेत हा देशातील उच्चांक आहे.
  • तसेच दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यात एकाच दिवशी नऊ लाख चौसष्ट हजार नागरीकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. हा देखील महाराष्ट्रातील उच्चांक आहे.
  • राज्य नागरीकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आर्थिक गतीविधींना चालना देण्याचाही प्रयत्न करीत आहे. यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत.
  • नजीकच्या काळात येणारे विविध सण व उत्सव लक्षात घेता गर्दी व्यवस्थापनासाठी नागरीकांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजना जसे मास्कचा वापर, हाताची स्वच्छता व सुरक्षित शारिरीक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होऊन नागरीकांचा कोविड प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी नागरिकांनी भविष्यात देखील असेच सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.