उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी! पंतप्रधान मोदी यांची  100 लाख कोटीच्या योजनेची घोषणा

Banner

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांवर भर देणार असल्याचे म्हटले . पंतप्रधानांनी देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरता पंतप्रधान गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन आखण्यात आल्याचे  म्हटले.

100 लाख कोटींच्या या योजनेमधून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील. पंतप्रधान गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन औद्योगिक उपक्रमांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होण्याआधी भारताला ऊर्जेसंबंधित आत्मनिर्भर करायचे आहे.

Image

75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त  लाल किल्ल्यावरुन भाषण करताना पंतप्रधानांनी विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी असे म्हटले की, ‘आधुनिक पायाभूत सुविधांसह पायाभूत क्षेत्रासाठी भारताला एक समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे. गतिशक्ती – राष्ट्रीय मास्टर प्लॅन योजना लवकरच या दिशेने सुरू केली जाईल. 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या या योजनेमुळे लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

Image

लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे

Image
  1. आज, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र उत्सवदिनी, देश आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि शूर वीरांना नमन करत आहे, जे राष्ट्राच्या संरक्षणासाठी अहोरात्र बलिदान देत आहेत. देश आज  या प्रत्येक विभूतीचे स्मरण करत आहे. आदरणीय बापु, ज्यांनी स्वातंत्र्य ही एक  लोक चळवळ बनवली , नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले,  भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान सारखे महान क्रांतिकारक; झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा किंवा राणी गायदिनलियू किंवा मातंगीनी हजराचे शौर्य; देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जी, सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी देशाला एकसंध राष्ट्र बनवले  आणि बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी भारताची भावी दिशा ठरवली आणि मार्ग सुकर  केला. देश या सर्व महान व्यक्तींचा सदैव ऋणी  आहे.
  2. आज आपण आपले स्वातंत्र्य साजरे करत असताना, फाळणीची  वेदना आपण विसरू शकत नाही जी आजही सर्व भारतीयांच्या हृदयाला सलत आहे.  गेल्या शतकातील ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या लोकांचा  खूप लवकर विसर पडला.  कालच भारताने एक भावनिक निर्णय घेतला आहे, आपण यापुढे 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीतील  बळींच्या स्मरणार्थ “फाळणी भयावह स्मृती  दिन” म्हणून साजरा करणार आहोत.  ज्यांना अमानुष परिस्थितीला सामोरे जावे लागले, ज्या ंना अत्याचार सहन करावे लागले त्यांच्यावर सन्मानाने  अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. ते सर्व जिवंत राहिले पाहिजेत आणि आपल्या  आठवणींमधून  कधीही मिटले जाऊ नयेत. 75 व्या स्वातंत्र्यदिनी ” “फाळणी भयावह स्मृती  दिन” पाळण्याचा  निर्णय ही प्रत्येक भारतीयाकडून त्यांना उचित  श्रद्धांजली आहे.
  3. आधुनिक पायाभूत सुविधांबरोबरच पायाभूत सुविधांच्या बांधकामात समग्र आणि एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारण्याची नितांत गरज आहे. नजीकच्या भविष्यात, आपण  पंतप्रधान ‘गती शक्ती’ चा राष्ट्रीय बृहत आराखडा जाहीर करणार आहोत. ही एक मोठी योजना असेल आणि कोट्यवधी देशवासियांची स्वप्ने पूर्ण करेल. 100 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या या योजनेमुळे लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
  4. आपल्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे की, आपल्या  शास्त्रज्ञांमुळे, आपण दोन मेक इन इंडिया कोविड लस विकसित करण्यात आणि जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यात यशस्वी झालो.
  5. महामारीच्या रोगाने संपूर्ण जगाला वेठीस धरले असताना एवढ्या मोठ्या संकटाच्या वेळी लस मिळवणे अत्यंत कठीण होते.  भारताला कदाचित लस  मिळाली असती  किंवा नसती  आणि जरी त्याला लस मिळाली असती तरी ते वेळेत मिळण्याची खात्री नव्हती.  परंतु आज आपण अभिमानाने सांगू शकतो की जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आपल्या देशात चालवला जात आहे. 54 कोटीहून अधिक लोकांना लसीची मात्रा मिळाली  आहे. कॉविन आणि डिजिटल प्रमाणपत्र  सारख्या ऑनलाइन प्रणाली आज जगाला आकर्षित करत आहेत.
  6. आपले  डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, लस विकसित करण्यात गुंतलेले शास्त्रज्ञ, या करोना वैश्विक महामारीच्या काळात सेवाभावाने  गुंतलेले लाखो देशवासीय देखील आपल्या सर्वांच्या कौतुकास पात्र आहेत.
  7. भारताच्या तरुण पिढीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला अभिमानास्पद कामगिरी केली आहे, हे सगळे खेळाडू आज आपल्यात उपस्थित आहेत. त्यांनी केवळ आपले मनच जिंकले नाही, तर भारताच्या  युवा पिढीला, प्रेरणा देण्याचे खूप मोठे काम केले आहे.
  8. महामारीच्या काळात  80 कोटी देशवासियांना  सातत्याने मोफत अन्नधान्य पुरवून भारताने ज्याप्रकारे गरीबांच्या घराची चूल पेटती ठेवली  आहे , ते केवळ जगाला चकित करणारे नाही तर चर्चेचा विषय बनला आहे.
  9. हे खरे आहे की इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे; हे देखील खरे आहे की जगातील इतर देशांच्या लोकसंख्येच्या तुलनेत, भारतात अधिक नागरिकांना वाचवण्यात आपण यशस्वी झालो , मात्र ही  अभिमान वाटण्यासारखी गोष्ट नाही! आपण या  गौरवांवर थांबू शकत नाही. कोणतेही आव्हान नव्हते असे म्हणणे, आपल्या स्वतःच्या विकासाच्या मार्गात एक प्रतिबंधात्मक विचार बनेल.
  10. आपले  ध्येय असे एक राष्ट्र विकसित करणे आहे जिथे आपल्याकडे केवळ जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा नसतील  तर ‘किमान सरकार, कमाल शासन’ या मंत्राने पुढे मार्गक्रमण  करत राहू.
  11. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त आपण फक्त एका समारंभापुरता मर्यादित राहू  नये. आपण नवीन संकल्पांची  पायाभरणी केली पाहिजे आणि नवीन संकल्पांसह पुढे जायला हवे. येथून सुरुवात करत, पुढील 25 वर्षांचा संपूर्ण प्रवास, जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू, तेव्हा नवीन भारताच्या निर्मितीच्या अमृत काळाची नोंद केली जाईल.  या अमृत काळात आपल्या  संकल्पांची पूर्तता आपल्याला भारतीय स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्धापनदिनाकडे  अभिमानाने घेऊन जाईल.
  12. ‘अमृत काल’ चे ध्येय भारत आणि भारतातील नागरिकांसाठी समृद्धीच्या नवीन उंची गाठणे हे आहे. ‘अमृत काल’ चे ध्येय अशा नवभारताची निर्मिती करणे आहे जिथे सुविधांचा स्तर गाव आणि शहराची विभागणी करत नाही. ‘अमृत काल’ चे ध्येय असा भारत निर्माण करणे आहे जेथे सरकार नागरिकांच्या जीवनात अनावश्यक हस्तक्षेप करणार  नाही. ‘अमृत काल’ चे ध्येय असा भारत निर्माण करणे आहे जिथे जगातील प्रत्येक आधुनिक पायाभूत सुविधा असेल.
  13. हा काळ 25 वर्षांचा आहे. परंतु आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला जास्त काळ वाट पाहाणे इष्ट ठरणार नाही. आपल्याला आत्ताच सुरुवात करावी लागेल. आपल्याला एक क्षणही वाया घालवायचा नाही. हीच योग्य वेळ आहे. आपल्या देशातही परिवर्तन घडवायचे आहे आणि नागरिक म्हणून आपणही स्वतःला बदलायला हवे. आपल्यालाही बदलत्या युगाशी जुळवून घ्यावे लागेल. आम्ही ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या भावनेने सुरुवात केली आहे. आज मी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून विनंती करत आहे की ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ आणि आता सबका प्रयास हे आमच्या ध्येयपूर्तीसाठी खूप महत्वाचे आहेत.
  14. या भारताच्या विकास यात्रेमध्ये, जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करू तेव्हा आपण आत्मनिर्भर भारत उभारण्याचे आपले ध्येय पूर्ण करू हे सुनिश्चित करावे लागेल.
  15. ज्याप्रमाणे आम्ही 100% घरांमध्ये वीज उपलब्ध करून दिली आहे, आणि 100% घरांमध्ये शौचालये बांधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत, त्याचप्रमाणे आता आपल्याला योजनांच्या परिपूर्णतेचे उद्दिष्ट ठेवून वाटचाल करायची आहे आणि यासाठी आपल्याला दीर्घकालीन मुदत ठरवायची नाही. त्यासाठी आम्ही नाही दूरची मुदत ठेवावी लागेल. आपल्याला आपले संकल्प काही वर्षातच साकार करायचे आहेत.
  16. आता आपल्याला आणखी परिपूर्णतेकडे जायचे आहे. 100% गावांमध्ये रस्ते असावेत, 100% घरांमध्ये बँक खाते असावे, 100% लाभार्थींकडे आयुष्मान भारत कार्ड असावे, 100% पात्र व्यक्तींकडे उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी असावी आणि 100% लाभार्थींना आवास (घरकुल) असावे.
  17. आपल्याला शंभर टक्के कामगिरीच्या मानसिकतेने मार्गक्रमण करायचे आहे. आत्तापर्यंत, आमच्या फेरीवाल्यांसाठी कोणताही विचार केला गेला नाही, जे आपला माल रुळांवर, पदपथावर आणि गाड्यांवर विकतात. हे सर्व सहकारी आता स्वनिधी योजनेद्वारे बँकिंग प्रणालीशी जोडले जात आहेत.
  18. प्रत्येक नागरिक सरकारच्या परिवर्तनशील योजनांशी जोडलेला आहे हे सुनिश्चित करण्याच्या ध्येयाने आपल्याला पुढे जायचे आहे. गेल्या काही वर्षात आमच्या सरकारने गावांना रस्ते आणि वीज पुरवली आहे. आता ही गावे ऑप्टिकल फायबर नेटवर्क डेटा आणि इंटरनेटने अधिक सक्षम झाली आहेत.
  19. मला आनंद आहे की जल जीवन अभियानाच्या केवळ 2 वर्षांच्या कालावधीत, 4.5 कोटी कुटुंबांना नळाद्वारे पाणी प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे; जेव्हा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो तेव्हा हे आमचे खरे यश आहे.
  20. पोषण हे आमच्या सरकारचे मुख्य लक्ष आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि आरोग्य व कल्याण केंद्रासारख्या  पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर देखील सरकार काम करत आहे.
  21. आपल्याला मागास प्रवर्ग आणि क्षेत्रांना प्राधान्य देण्याची गरज आहे. मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या काळजीसह, दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि सामान्य श्रेणीतील गरीब लोकांसाठी आरक्षण सुनिश्चित केले जात आहे. अगदी अलीकडे, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात, अखिल भारतीय कोट्यात ओबीसी प्रवर्गासाठी देखील आरक्षण सुनिश्चित केले गेले आहे. संसदेत कायदा तयार करून, ओबीसींची स्वतःची यादी बनवण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे.
  22. शिधावाटप दुकानात उपलब्ध तांदूळ असो, मध्यान्ह भोजनात उपलब्ध तांदूळ असो, प्रत्येक योजनेद्वारे उपलब्ध तांदूळ 2024 पर्यंत पोषक असेल.
  23. जम्मू -काश्मीरमध्ये परिसीमा आयोगाची स्थापना करण्यात आली असून विधानसभा निवडणुकीची तयारीही सुरू आहे.
  24. लडाख  परिवर्तनाचा एक नवीन टप्पा पाहत आहे. तिथे सरकार जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत आहे. एकीकडे लडाख आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे साक्षीदार ठरत आहे, तर दुसरीकडे, ‘सिंधू मध्यवर्ती विद्यापीठ ‘ लडाखला उच्च शिक्षणाचे केंद्र बनवणार आहे.
  25. ईशान्येकडे पर्यटन, साहसी खेळ, सेंद्रिय शेती, वनौषधी आणि  नैसर्गिक तेल या क्षेत्रात मोठी क्षमता आहे. आपल्याला या क्षमतेचा पुरेपूर वापर करून तो देशाच्या विकास प्रवासाचा एक भाग बनवायचा आहे. आणि आपल्याला हे काम ‘अमृत काळ’ च्या काही दशकांच्या आत पूर्ण करायचे आहे. सर्वांच्या क्षमतांना योग्य संधी देणे हा लोकशाहीचा खरा आत्मा आहे. जम्मू असो किंवा काश्मीर, विकासाचा समतोल आता या भूमीवर सर्वत्र दिसत आहे.
  26. पूर्वेकडील प्रदेश, ईशान्येकडील प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, संपूर्ण हिमालयीन प्रदेश, आपला किनारपट्टीचा प्रदेश किंवा आदिवासी प्रदेश, हे भविष्यात भारताच्या विकासासाठी एक मोठा आधार बनेल.
  27. आज ईशान्येकडे संपर्क क्रांतीचा, कनेक्टिव्हिटीचा, नवा इतिहास लिहिला जात आहे. ही कनेक्टिव्हीटी मनामनाची आहे आणि पायाभूत सुविधांचीसुद्धा आहे. लवकरच ईशान्येकडील सर्व राज्यांच्या राजधान्यांना रेल्वे सेवेने जोडण्याचे काम पूर्ण होणार आहे.
  28. अॅक्ट ईस्ट धोरणांतर्गत, आज ईशान्य, बांगलादेश, म्यानमार आणि दक्षिण-पूर्व आशिया देखील जोडले जात आहेत. गेल्या वर्षांत केलेल्या प्रयत्नांमुळे, आता श्रेष्ठ भारत निर्मितीचा उत्साह आणि ईशान्येकडील दीर्घकालीन शांतता अनेक पटींनी वाढली आहे.
  29. आम्ही आमच्या गावांच्या विकासाच्या प्रवासात एका नवीन टप्प्याचे साक्षीदार आहोत. यात केवळ वीज आणि पाणी नाही तर डिजिटल उद्योजकांना प्रोत्साहन देखील आहे.देशाच्या 110 हून अधिक महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, पोषण, रस्ते, रोजगार यासंबंधी योजनांना प्राधान्य दिले जात आहे. यातील अनेक जिल्हे आदिवासी भागात आहेत.
  30. आपल्या छोट्या शेतकऱ्यांना मदत करण्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. आम्हाला सरकारच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ त्यांना द्यायचा आहे; मग ते डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) किंवा कृषी रेल्वेद्वारे असो.
  31. किसान रेल्वेच्या आधुनिक सुविधेमुळे छोट्या शेतकऱ्यांची उत्पादने कमी उत्पादन खर्चात आणि वाहतुकीच्या कमी खर्चात दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी मदत होत आहे. कमलम, शाही लिची, भूतजोलोकिआ मिरची ,काळा तांदूळ किंवा हळद अशी अनेक उत्पादने जगातील विविध देशांमध्ये निर्यात केली जात आहेत.
  32. सरकार आता छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणावर भर देत आहे. 10 कोटी शेतकरी कुटुंबांना त्यांच्या बँक खात्यात थेट 1.5 लाख कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
  33. स्वामित्व योजना ग्रामीण भारतातील जीवनात परिवर्तन करत आहे. आपल्या  ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जमिनीचे स्थान निश्चित करणारा  नकाशा तयार करण्यासाठी आणि विविध योजना/कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ड्रोनची मदत होत आहे.
  34. सहकार म्हणजे केवळ कायदे आणि नियमांचे जाळे असलेली व्यवस्था नाही, तर सहकार हा एक आत्मा, संस्कृती आणि सामूहिक प्रगतीची मानसिकता आहे.आम्ही स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून सहकाराच्या सक्षमीकरणासाठी पावले उचलली आहेत. राज्यांमधील सहकार क्षेत्राला सक्षम करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.
  35. येत्या काही वर्षांत आपल्याला देशातील छोट्या शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती वाढवावी लागेल. त्यांना नवीन सुविधा द्याव्या लागतील.आम्ही या शेतकऱ्यांना स्वामित्व योजनेद्वारे सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
  36. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव 75 आठवडे साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 12 मार्च पासून सुरू झालेला हा उत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालू राहील. आपल्याला नवीन उत्साहाने पुढे जायचे आहे आणि म्हणूनच देशाने हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
  37. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या 75 आठवड्यांदरम्यान 75 वंदे भारत रेल्वेगाड्या देशाच्या कानाकोपऱ्याशी  जोडल्या जातील. देशात ज्या वेगाने नवीन विमानतळ बांधले जात आहेत आणि दुर्गम भागांना जोडणारी उडाण योजना हे अभूतपूर्व आहे.
  38. अत्याधुनिक नावीन्यपूर्ण आणि नव्या युगातील तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल.
  39. जनौषधी योजनेअंतर्गत गरीब आणि गरजूंना आता परवडणाऱ्या दरात औषधे मिळत आहेत. 75,000 हून अधिक आरोग्य आणि कल्याण केंद्रे बांधण्यात आली आहेत. आणि आम्ही स्थानिक पातळीवर रुग्णालयांचे जाळे उभारण्यासाठी काम करत आहोत.
  40. आपली विकासात्मक प्रगती आणखी वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या उत्पादन आणि निर्यातीवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
  41. कोरोनामुळे उद्भवलेल्या नवीन आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आपल्या मेक इन इंडिया मोहिमेला बळकट करण्यासाठी देशाने उत्पादन संलग्न प्रोत्साहन जाहीर केले आहे. ही योजना लागू झाल्यानंतर झालेल्या परिवर्तनाचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र एक उदाहरण आहे.सात वर्षांपूर्वी आपण  सुमारे आठ अब्ज डॉलर्सचे मोबाईल फोन आयात करत असू. मात्र  आता आयात बऱ्याच  अंशी  कमी झाली आहे आणि आज आपण तीन अब्ज डॉलर्स किंमतीचे मोबाईल फोन निर्यात करत आहोत.
  42. विकासाच्या मार्गावर वाटचाल करताना भारताला आपले उत्पादन आणि निर्यात दोन्हीही वाढवावे लागेल. तुम्ही पाहिले आहे, काही दिवसांपूर्वीच भारताने आपले पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या  सागरी चाचण्या सुरु केल्या. आज भारत स्वतःचे स्वदेशी लढाऊ विमान, स्वतःची पाणबुडी तयार करत आहे. गगनयान अंतराळात भारताचा झेंडा फडकवणार आहे.हा  स्वदेशी उत्पादनातील भारताच्या अफाट क्षमतेचा हा पुरावा आहे.
  43. मला उत्पादकांना सांगायचे आहे की, – तुम्ही बनवलेले प्रत्येक उत्पादन भारतासाठी ब्रँड अॅम्बेसेडर आहे. जोपर्यंत उत्पादन वापरात आहे, तोपर्यंत ग्राहक  म्हणेल – होय हे भारतीय बनावटीचे म्हणजेच मेड इन इंडिया आहे.
  44. आपल्याला गुंतागुंतीच्या धोरणांच्या स्वरूपातील सरकारचा अति सहभाग थांबवावा लागेल. आज आपण 15,000 हून अधिक अनावश्यक अनुपालन रद्द केले आहेत.
  45. आपण कर सुधारणा आणल्यामुळे जगण्यातील सुसह्यतेला आणि व्यवसाय सुलभतेला चालना मिळेल. सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तम आणि वेगवान प्रशासन आवश्यक आहे. भारत सुशासनाचा नवा अध्याय कशाप्रकारे लिहित आहे याचे आज संपूर्ण जग साक्षीदार आहे.
  46. अधिकारी वर्गात लोककेंद्री दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी, आम्ही कर्मयोगी अभियान आणि क्षमता बांधणी कार्यक्रम सुरू केला आहे.
  47. आज देशात 21 व्या शतकातील गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण देखील आहे. आता आपली मुले  कौशल्याच्या अभावामुळे थांबणार नाहीत किंवा ते  भाषेच्या अडथळ्यांमध्ये अडकून  राहणार नाहीत. हे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण एकप्रकारे गरिबीविरोधात लढण्यासाठी एक उत्तम साधन ठरणार आहे.शिक्षण, प्रतिष्ठा आणि स्थानिक भाषेचे महत्व या गोष्टीदेखील गरिबीविरूद्ध युद्ध जिंकण्याचा आधार आहेत.
  48. बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमाला बळकटी देण्याच्या दिशेने पुढे जात आता आपल्या मुली सैनिकी  शाळांमध्येही शिकू शकतील. आज शिक्षण असो किंवा ऑलिम्पिक आपल्या मुली जबरदस्त कामगिरी करत आहेत. त्यांना समान संधी मिळाल्या पाहिजेत आणि त्यांना सुरक्षित आणि आदरयुक्त वाटले पाहिजे हे आपण सुनिश्चित केले आहे.
  49. गावांमधील आठ कोटींपेक्षा जास्त भगिनी बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्या संपूर्ण उत्पादनाची निर्मिती करतात. आता सरकार त्यांच्या उत्पादनांसाठी देशात आणि परदेशात मोठी बाजारपेठ सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ई-कॉमर्स मंचदेखील तयार करेल. जेव्हा देश व्होकल फॉर लोकल हा मंत्र घेऊन पुढे जात आहे तेव्हा हे डिजिटल व्यासपीठ महिला स्वयंसहायता गटांची उत्पादने देशातील दूरवरच्या भागात तसेच परदेशातील लोकांपर्यंत पोहोचवेल आणि याचे दूरगामी परिणाम दिसून येतील.
  50. भारत ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी नाही. ऊर्जा आयात करण्यासाठी 12 लाख कोटी रुपयांचा खर्च येतो. आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना, आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की भारत आत्मनिरभिन ऊर्जा उत्पादन होईल. भारत ऊर्जा उत्पादनातही आत्मनिर्भर होईल.
  51. आम्ही आज राष्ट्रीय सुरक्षेइतकेच महत्त्व पर्यावरण संरक्षणालाही देत आहोत. मग ते जैवविविधता असो किंवा मग निकृष्ट जमीन पुन्हा चांगली करणे, हवामान बदल असो किंवा मग कचऱ्याचा पुनर्वापर , सेंद्रिय शेती .. भारत या सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे.
  52. एकविसाव्या शतकातील या दशकात, भारत नील-अर्थव्यवस्थेच्या आपल्या प्रयत्नांना आणखी गती देईल. ‘खोल सागरी अभियान’  समुद्रात खोलवर लपलेल्या अमर्याद  संधींचा शोध घेण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षांचा पुरावा आहे. जी खनिज संपत्ती समुद्रात खोलवर लपलेली आहे, जी औष्णिक उर्जा समुद्राच्या पाण्यात आहे ती देशाच्या विकासाला नव्या उंचीवर पोहोचवू शकते.
  53. हरित हायड्रोजन हे जगाचे भविष्य ठरणार आहे. हरित हायड्रोजनच्या क्षेत्रातील उद्दिष्ट प्राप्तीसाठी मी आज या तिरंग्याच्या साक्षीनं राष्ट्रीय हायड्रोजन अभियानाची घोषणा करतो आहे.
  54. या ‘अमृतकाळात’ आपल्याला देशाला हरित हायड्रोजनचे उत्पादन आणि निर्यातीचं जागतिक केंद्र बनवायचं आहे. उर्जेच्या क्षेत्रातली ही नवी प्रगती भारताला आत्मनिर्भर बनवेल. तसंच स्वच्छ ऊर्जेकडे भारताला रुपांतरीत करण्यासाठीची ही एक नवी प्रेरणा देखील ठरेल. या हरित प्रगतीतून हरित क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी आपल्या युवकांसाठी आणि आपल्या स्टार्टअप कंपन्यांसाठी निर्माण होत आहेत.
  55. भारताने इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेने देखील पुढचे पाऊल टाकले आहे आणि रेल्वेच्या शंभर टक्के विद्युतीकरणासाठी देखील काम अतिशय जलदगतीने सुरू आहे. 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे भारतीय रेल्वेने लक्ष्य निर्धारित केले आहे.
  56. या सर्व प्रयत्नांबरोबरच देश चक्राकार अर्थव्यवस्था अभियानावर देखील भर देत आहे. वाहने भंगारात काढण्याचे आपले धोरण याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. आज जी-20 या देशांच्या समूहात भारत असा एकमात्र देश आहे जो आपल्या हवामान बदलाची लक्ष्ये साध्य करण्याच्या दिशेने जलदगतीने आगेकूच करत आहे.
  57. भारताने या दशकाच्या अखेरपर्यंत म्हणजे 2030 पर्यंत 450 गिगावॉट अक्षय  उर्जा निर्मिती करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यापैकी 100 गिगावॉट उर्जानिर्मितीचे लक्ष्य भारताने निश्चित केलेल्या मुदतीपूर्वीच साध्य केले आहे.
  58. भारत अशा समस्याही आज सोडवत आहे, ज्या सोडविण्यासाठी कित्येक दशके, कित्येक शतके  वाट पाहावी लागली होती. कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय असो, देशाला कराच्या जंजाळातून मुक्त करणारी व्यवस्था असो, वस्तू आणि सेवा कर असो, आपल्या सैनिकांसाठी एक श्रेणी-एक पेन्शनची व्यवस्था असो, रामजन्मभूमी विवादाप्रकरणी शांततामय मार्गाने तोडगा या सगळ्या गोष्टी गेल्या काही काळात प्रत्यक्षात येताना आपण पहिल्या आहेत.
  59. त्रिपुरात कित्येक दशकांनंतर ब्रू- रियांग करार होणे असो, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणे असो किंवा मग जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे असो. भारताची संकल्पशक्ती आपण यातून सातत्याने सिद्ध करतो आहोत.
  60. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक संबंधांचे स्वरूप बदलले आहे. कोरोनानंतरही म्हणजेच कोरोनोत्तर काळातही जगाची नव्या प्रकारे रचना होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात जगाने भारताचे प्रयत्न पहिले आहेत. आज जग भारताकडे एका नव्या दृष्टीकोनातून बघते आहे. आणि या दृष्टीकोनाचे दोन महत्वाचे पैलू आहेत. एक दहशतवाद आणि दुसरा विस्तारवाद. भारत या दोन्ही आव्हानांशी लढा देतो आहे. कणखरतेने आणि हिंमतीने या आव्हानांना उत्तरही देतो आहे. भारताला आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडता यावी यासाठी भारताचे संरक्षण करणाऱ्यांनाही तेवढेच सक्षम असणं आवश्यक आहे.
  61. आजचा युवक “कॅन डू” पिढीचा प्रतीनिधी आहे. त्यांच्या मनात जे काही असेल, ते सर्व साध्य करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आपली आजची कृतीच उद्याचे आपले भविष्य निश्चित करणार आहे.  आपला आज भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीची संकल्पना निश्चित करणार आहे.
  62. मी भविष्यवेत्ता नाही. मी कर्मफळावर विश्वास ठेवतो. माझा देशातल्या युवकांवर विश्वास आहे. देशाच्या भगिनींवर, देशाच्या मुलींवर, देशाच्या शेतकऱ्यांवर, देशातल्या व्यावसायिकांवर माझा विश्वास आहे. ही. ही “कॅन डू’ पिढी कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकते, यावर माझा विश्वास आहे
  63. 21व्या शतकात भारताची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यात येणारी कुठलीही अडचण आता आपल्याला रोखू शकत नाही. आपली जीवट शक्ती हीच आपली ताकद आहे, एकजूट असणे ही आपली ताकद आहे. “राष्ट्र प्रथम – सदैव प्रथम” ही भावनाच आपली प्राणशक्ती आहे. हा काळ एकत्रित स्वप्ने बघण्याचा काळ आहे. हा काळ एक होऊन संकल्प करण्याचा काळ आहे. हा काळ एकवटून प्रयत्न करण्याचा काळ आहे. आणि हाच काळ आहे ज्यावेळी आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे.
  64. आज देशातले महान विचारवंत श्री अरविंदो यांचीही जयंती आहे. वर्ष 2022 मध्ये त्यांची 150 वी जयंती येणार आहे. श्री अरविंदो भारताच्या उज्ज्वल भविष्याचे द्रष्टे पुरुष होते. ते म्हणत असत की “आपण आधी कधीच नव्हतो तेवढे सामर्थ्यवान आपल्याला व्हावे लागेल. त्यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. एक नवे हृदय घेऊन आपल्याला स्वतःला पुन्हा जागृत करावे लागेल.” श्री अरविंदो यांचे हे विचार आपल्याला आपल्या कर्तव्यांचे भान देणारे आहेत.
  65. स्वामी विवेकानंदजी जेव्हा भारताच्या भविष्याबद्दल बोलत असत, भारतमातेच्या भव्यतेचे जेव्हा ते दर्शन करत असत तेव्हा ते म्हणायचे की जितके शक्य होईल तितके देशाच्या भूतकाळाकडे पहा. आपल्या देशाच्या भूतकाळात जो अखंड, नवीनतम झरा वाहतो आहे, त्याचे पाणी आकंठ प्राशन करा आणि त्यानंतर भविष्याकडे बघा, पुढे बघा, अग्रेसर व्हा! भारताला पहिल्या पेक्षाही अधिक उज्ज्वल, महान आणि श्रेष्ठ बनवा. देशाच्या असीम सामर्थ्यावर विश्वास ठेवत पुढे जाणे, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपली जबाबदारी  आहे. पुढल्या पिढीच्या पायाभूत सुविधांसाठी आपण मिळून काम करायला हवं, जागतिक दर्जाच्या उत्पादन निर्मितीकरिता आपल्याला मिळून काम करायला हवं नव्या युगाच्या, अत्याधुनिक नवोन्मेषासाठी आपल्याला एकत्रित काम करायला हवे. नव्या युगाच्या तंत्रज्ञानाकरता आपण एकत्रित काम करायला हवे.