स्वातंत्र्यलढ्यासह देशाच्या जडणघडणीतील क्रांतिसिंहांचे योगदान प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई, ३ऑगस्ट /प्रतिनिधी :-इंग्रजांच्या राजवटीत दीड हजार गावात प्रतिसरकार चालविणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासह देशाच्या जडणघडणीत, तसेच बहुजन समाजाच्या कल्याणासाठी क्रांतिसिहांनी केलेले कार्य अलौकीक असून त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयाला कायम प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, महात्मा गांधीजींनी सुरु केलेल्या असहकार चळवळीतील सहभागासह ‘प्रतिसरकार’च्या आंदोलनापर्यंत क्रांतीसिंहांनी केलेले कार्य देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविले आहे. प्रतिसरकारच्या माध्यमातून त्यांनी लोकन्यायालये, बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठ्यासाठी पर्यायी यंत्रणा निर्माण केली होती. गावगुंड, समाजकंटकांवर वचक निर्माण केला होता. इंग्रज सरकारविरोधातलं हे फार मोठं धाडस होतं. स्वातंत्र्य लढ्याबरोबरच त्यांनी देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. शिक्षणप्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, अनिष्ठ रुढी-परंपरांवर बंदी यासाठी प्रबोधनाचे कार्य केले. स्वातंत्र्यलढ्यानंतरही देशाच्या जडणघडणीसाठी क्रांतीसिंहांनी आपले आयुष्य वेचले, त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयाला कायमच प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन केले आहे.