देशात रुग्ण बरे होण्याचा दर 52.96% पर्यंत वाढला
नवी दिल्ली, 18 जून 2020
कोविड-19 ची चाचणी सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावी म्हणून तयार करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या फिरत्या आय-लॅबचे (संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा) उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले. देशातील दुर्गम, अंतर्गत आणि सुलभ दळणवळणाचे मार्ग नसलेल्या भागात ही प्रयोगशाळा तैनात केली जाईल आणि प्रति दिन 25 कोविड-19 आरटी-पीसीआर चाचण्या, दररोज 300 एलिसा चाचण्या, क्षयरोग, एचआयव्ही इत्यादींसाठी अतिरिक्त चाचण्या घेण्याची तिची क्षमता आहे. कोविड नियंत्रण धोरणाअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने ही संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासात कोविड-19 चे 7390 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,94,324 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 52.96% पर्यंत वाढला आहे. सध्या 1,60,384 संक्रमित रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
शासकीय प्रयोगशाळांची संख्या 699 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 254 पर्यंत वाढली आहे (एकूण 953 प्रयोगशाळा). वर्गवारी खालीलप्रमाणे:
जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 540 (शासकीय: 349 + खाजगी: 191)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 340 (शासकीय: 325 + खाजगी: 15)
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 73 (शासकीय: 25 + खाजगी: 48)
गेल्या 24 तासात 1,65,412 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत 62,49,668 नमुने तपासण्यात आले.
इतरअपडेट्स:
- दिल्लीतील कोविड -19 परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी आणि सोमवारी म्हणजे 15 आणि 16 जून रोजी बैठकांच्या शृंखलेत घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने त्वरित नमुना चाचणी संख्या दुप्पट करण्यात आली. 15-16 जून रोजी एकूण 16,618 चाचणी नमुने घेण्यात आले. त्याआधी 14 जून पर्यंत दररोज 4,000 ते 4,500 नमुने गोळा केले जायचे. आतापर्यंत 6,510 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत आणि उर्वरित अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. कोविड व्यवस्थापन बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या 242 प्रतिबंधात्मक क्षेत्रात घरोघरी जाऊन रहिवाशांचे आरोग्य सर्वेक्षण केले गेले. या क्षेत्रातील एकूण 2,30,466 लोकसंख्येपैकी 15-16 जून दरम्यान 1,77,692 व्यक्तींचे संपूर्ण सर्वेक्षण केले गेले आहे. उर्वरित व्यक्तींचे सर्वेक्षण 20 जूनपर्यंत केले जाईल.
- आपापल्या गावात गेलेल्या स्थलांतरित मजूर आणि ग्रामीण जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी, केंद्र सरकारने “गरीब कल्याण रोजगार योजना’ ही अत्यंत मोठी ग्रामीण रोजगार आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 20 जून 2020 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमात सहभागी होतील.
- रेल्वे मंत्रालयाने सुरक्षा आणि परिचालनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पदे भरण्याची प्रक्रिया, जी जगातील सर्वात मोठी भरती प्रक्रीया आहे, ती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. सहाय्यक लोको पायलट (एएलपी) व तंत्रज्ञांच्या एकूण 64,371 संयुक्त रिक्त जागांसाठी रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) 03.02.2018 ते 31.03.2018 पर्यंत केंद्रीयकृत रोजगार अधिसूचना (सीईएन) क्रमांक 01/2018 द्वारे ऑनलाईन अर्ज मागविले होते. एकूण 47,45,176 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. निवड योजनेत वैद्यकीय तपासणी (लोको पायलट पदासाठी आवश्यक असलेल्या दूरस्थ दृष्टी / रंग दृष्टी आणि सतर्कतेच्या पातळीचा विचार करता ही कठोर वैद्यकीय चाचणी आहे) आणि निवड केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीनंतर 3-स्तरीय संगणक आधारित चाचण्यांचा समावेश आहे. या पदांसाठी सुमारे 47.45 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती.
- समन्वयाद्वारे दाव्यांचा त्वरित तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आणि त्याद्वारे देयता कमी करण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) तीन स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापन करुन सामंजस्याची प्रक्रिया सुरु केली आहे. प्रत्येक समितीती प्रत्येकी तीन सदस्य आहेत. या समन्वय समितीचे अध्यक्ष न्यायपालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी, लोक प्रशासन, आर्थिक व खासगी क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आहेत. आतापर्यंत 108 प्रकरणे सीसीआयईकडे पाठविण्यात आली असून 13,349 कोटी रुपये किमतीचे दावे 3,743 कोटी रुपयांवर यशस्वीरित्या निकाली काढण्यात आले आहेत.