11 वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख कालवश
सोलापूर ,३० जुलै /प्रतिनिधी :- सोलापूरमधील सांगोला विधानसभेचे माजी आमदार गणपतराव देशमुखयांचं निधन झालं आहे. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गणपतराव देशमुख हे तब्बल 11 वेळा आमदार होते. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव होता. त्यांच्या निधनामुळे राजकीय विश्वावर शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिपस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जायचं आणि तब्बल 11 वेळा आमदार राहिलेले होते. सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अश्विनी रुग्णालयात मागील 15 जुलैपासून उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांचे संपूर्ण कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अश्विनी रुग्णालयात मागील 15 जुलैपासून उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. दीर्घ आजाराशी त्यांची झुंज आज अखेर संपली. सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती शेकापचे मध्यवर्ती कार्यालयीन चिटणीस अॅड. राजेंद्र कोरडे यांनी दिली आहे.
सर्वाधिक म्हणजेच तब्बल 11 वेळा एकाच पक्षाकडून निवडणूक जिंकणारे विक्रमवीर आमदार अशी गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. सांगोला तालुक्यात त्यांनी शेती, सहकार, पाणी, स्त्री सक्षमता यांबद्दल भरीव कामगिरी केली. अखेरपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या वैचारिक बैठकीशी ते एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने राज्यातील शेतकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुवतारा ढासळला, अशा भावना अॅड. राजेंद्र कोरडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
गणपतराव देशमुख यांच्यासमोर राजकारणातील अनेक पिढ्या घडल्या आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक मुख्यमंत्र्यांचं काम त्यांनी जवळून पाहिलं. एक व्यक्ती, एकच पक्ष आणि एकच मतदारसंघ आणि 11 वेळा आमदार हे उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्मिळच होतं.
गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. या माध्यमातून लोकांना न्याय देता देता त्यांची शेतकरी कामगार पक्षाशी काम करण्याची जवळीक झाली. 1950 पासून ते शेकापचे सक्रिय कार्यकर्ते झाले.
1962 साली गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द बहरू लागली. पहिली निवडणूक लढवताना दुष्काळी सांगोल्यातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी लढाई सुरू केली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.
1972 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण दोन वर्षांतच झालेल्या पोटनिवडणुकीत गणपतराव पुन्हा निवडून आले ते सलग 1995 पर्यंत. याकाळात 1977 साली त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभळले होते.
पुलोद काळात 1978 साली ते पहिल्यांदा राज्यमंत्री मंडळात सहभागी झाले. त्यानंतर 1999 साली पुन्हा मंत्री झाले. याकाळात त्यांनी दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कायम लढा दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुष्काळी सांगोल्यात टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी पोहचले.
1995 च्या पराभवानंतर गणपतराव देशमुख यांनी 1999 पुन्हा निवडून आले. 2014 पर्यंत त्यांनी 11 वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले. 2019 साली सुद्धा त्यांना निवडणूक लावण्याचा आग्रह समर्थ समर्थकांनी केला. पण 94 वर्ष असलेले वय तसेच शरीर साथ देत नसल्याने त्यांनी निवडणूक न लढवण्यावर ठाम राहत आपला निर्णय बदलला नाही.
एकच शेतकरी कामगार पक्ष, एकच मतदारसंघ सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि एकच उमेदवार गणपतराव देशमुख महाराष्ट्रात असं उदाहरण दुर्मिळच आहे. आजोबांपासून नातवाचेही मतदान गणपतराव यांना मिळाले होते. आयुष्यातील 50 वर्ष त्यांनी विधानसभेतील अनेक मुख्यमंत्री आणि मंत्री यांचे काम पाहिली होती. तसंच आपल्या कामाचा ठसा सुद्धा त्यांनी राज्यातील राजकारणात उमटवला होता. आज त्यांच्या जाण्यामुळे विधानसभेचा एक साक्षीदार निखळला अशी भावना व्यक्त होत आहे.