खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात

कोरोनामुळे अडचणीत असलेल्या पालकांना मोठा दिलासा

मुंबई,२८जुलै /प्रतिनिधी  :- कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना सुद्धा भरमसाठा फी वसूल करणाऱ्या शिक्षण सम्राटांना अखेर महाविकास आघाडी सरकारने दणका दिला आहे. खासगी शाळांची फीमध्ये  15 टक्के कपात करण्याच्या निर्णयाची घोषणा  शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.कोरोनामुळे अडचणीत असलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा दिला आहे. 

Image

शालेय शिक्षण विभागाने फी कपातीला मंजुरी दिली आहे.शालेय शिक्षण शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खासगी शाळांची फी १५ टक्के कमी होणार आहे. आता पालकांना ८५ टक्के फी भरावी लागणार आहे. राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार आहे. राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. यावर्षी ज्या पालकांनी पूर्ण फी भरलेली आहे, त्याबाबतही लवकरच निर्णय कळवला जाईल असे  वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 

खासगी शाळांची फी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. मात्र करोना काळात राज्य सरकारच्या निर्देशानुसार शाळा बंद आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये शाळेतील फी कपातीचा अधिकार सरकारकडे घेण्याचं अध्यादेशामध्ये असल्याचं समोर आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला होता. महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे १५ टक्के शुल्क कमी करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली होती.