माझे झाड माझी जबाबदारी- राज्यमंत्री अब्दुल सत्तार
औरंगाबाद,२४जुलै /प्रतिनिधी :-कोरोना संसर्गाच्या काळात आपण सर्वांनी ऑक्सिजनचे महत्व जाणलेच आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून अधिकाधिक ऑक्सीजन निर्माण होऊन पर्यावरणाचे संतुलन राखणे काळाजी गरज झाली असल्याने प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असून ‘ माझे झाड माझी जबाबदारी ’ या उदे्शाने प्रेरित होऊन जैवविविधता टिकवण्याकरीता नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिन विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले.
महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार यांच्या उपस्थिती बुध्द लेणी क्र. 7 च्या पायथ्याशी पहाडसिंगपूरा येथे संबोधी अकादमी, महाराष्ट्र संचालित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र च्या वतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रमात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी श्री. सत्तार बोलत होते.
यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, संबोधी अकादमीचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे, भन्ते अभयपुत्र महाथेरो, डॉ. दिनेश परदेशी, प्राचार्य संजय खंदारे, महेंद्र वाकळे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
वृक्षारोपण प्रसंगी श्री. सत्तार म्हणाले की, प्रत्येकाने वृक्षारोपण करुन आपली जबाबदारी पार पाडल्यास भविष्यात ऑक्सीजन संदर्भातील अडचणी येणार नाहीतच त्याचबरोबर जैवविविधता टिकवून पर्यावरण सेरक्षणास मदत होईल. येत्या पाच वर्षात येथील परिसर हा हिरवागार झाला पाहिजे इको- बटालियन यांच्या सहकार्याने येथील वृक्षाचे संवर्धन करता येईल जेणे करुन लोक येथे ऑक्सीजन घेण्याकरिता येतील.
या परिसरात संबोधी अकादमी तर्फे वृक्षरोपण तर करण्यात येतच आहे त्याच बरोबर बंधारा देखील बांधण्यात आला असून हे काम खरचं कौतुकास्पद असल्याचेही श्री. सत्तार यावेळी म्हणाले.
आमदार प्रदिप जैस्वाल यांनी संबोधी अकादमीच्या कामाचे कौतुक करत वृक्षारोपणाकरिता नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन ही केले तसेच आदार निधीतून मदत करण्याकरिता आश्वासित केले.
जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यावेळी म्हणाले की, जलसंधारणातून वृक्षारोपण करत जैवविविधता टिकवण्याकरिता इको बटालियनच्या माध्यमातून या कामाला अधिक गती देण्यात यावी, गोगाबाबा टेकडीच्या धर्तीवर हा परिसर देखीत हिरवाईने नटला पहिजे. याकरिता जिल्हा नियोजन विकास निधीतून निधी देण्यात येईल, असे आश्वासन देखिल यावेळी श्री. चव्हाण यांनी दिले.