ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर भाजपा स्वस्थ बसणार नाही-देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात
मुंबई ,१९जुलै /प्रतिनिधी :-ओबीसी आरक्षण प्रश्नी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. ‘आपल्या चुकीमुळे ओबीसी आरक्षण गेल्याचे माहीत असल्याने सध्या या मुद्द्यावर राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते कमी बोलतात आणि त्यांचे बोलके पोपट जास्त बोलतात’, अशा शब्दांत फडणवीस यांनी निशाणा साधला.
मुंबई येथे आयोजित भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते.माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आशीष शेलार, मंगल प्रभात लोढा,खा. संगम लाल गुप्ता, डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, योगेश टिळेकर यावेळी उपस्थित होते.
यावेळी मांडलेले प्रमुख मुद्दे असे: –
- ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले.
- ओबीसी समाजासाठी अनेक योजना केंद्र सरकार स्तरावर सुरू करण्यात आल्या.- राज्यात आपले सरकार असताना ओबीसी मंत्रालय सुरू करण्यात आले.
- महाराष्ट्रात केवळ अनेक योजना सुरू करण्यात आल्या नाही तर त्यासाठी भरीव निधी देण्यात आला.
- आपल्या ५ वर्षात आधी राम शिंदे आणि नंतर डॉ संजय कुटे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम पुढे नेले.
- आपल्या काळात ओबीसी आरक्षण टिकले आणि आता मात्र राज्य सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने हे राजकीय आरक्षण संपले.
- या सरकारने आधी केवळ न्यायालयात तारखा घेतल्या. जेव्हा न्यायालयात सरकार बोलले तेव्हा आरक्षण अतिरिक्त ठरते आहे, असे सांगून टाकले.
- प्रकरण ५ जिल्ह्यांचे आणि आरक्षण गेले संपूर्ण राज्यातील.
- जनगणनेचा नव्हे तर एम्पिरिकल डेटा सरकारला द्यायचा होता. पण केवळ दिशाभूल केली जाते आहे.
- – या सरकारला सारे माहिती आहे. पण तरीही विधानसभेत ठराव केला गेला.या षडयंत्रामागे कारण आहे,
- फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ३/४ क्षेत्रात होणाऱ्या निवडणुका. तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे. एकदा या निवडणुका झाल्या की राजकीय आरक्षण देऊनही उपयोग नाही.
- – मराठा आरक्षणासाठी ४ महिन्यात आम्ही एम्पिरिकल डेटा गोळा केला. हा डेटा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केला आहे.परवा मंत्री छगन भुजबळ येऊन गेले, मी त्यांना संपूर्ण सहकार्य करीन, असे सांगितले आहे. काम करायचे असेल तर ते सहज शक्य आहे. मी हे जबाबदारीने सांगतो आहे.
- – भाजपने या राखीव जागांवरील निवडणुकीत केवळ आणि केवळ ओबीसी समाजाला उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. मग एखादा उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल, पण यातून माघार नाही.
- ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर भाजपा स्वस्थ बसणार नाही.
- संघटित ओबीसी समाज निर्माण करणे आणि त्यातून समाज अधिक सक्षम करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे.