मत्स्य पालन ‘अर्थार्जनाचा उपयुक्त पर्याय’
प्रगत शेतकरी ज्ञानेश्वर भोकरे यांचा मत्स पालन व्यवसायातून यशस्वी अनुभव
कृषी विभागाच्या पोकरा योजनेअंतर्गत गटशेतीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास प्रोत्साहन मिळत आहे अशाच एका गटशेतीतील प्रगत शेतकरी ज्ञानेश्वर हे मत्स पालन व्यवसायातून शेती पूरक व्यवसायाचा यशस्वी अनुभव घेत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वानेगाव येथील ज्ञानेश्वर भोकरे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्याची मशागत पारंपरिक पद्धतीने करत ते इतर शेतकऱ्याप्रमाणे पीकांचे उत्पादन घेत होते, मात्र त्यात अधिक मेहनत करूनही त्या तुलनेत पूरेशा प्रमाणात उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे कृषी विभागाकडून प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याबाबतची मिळालेली माहिती त्यांना उपयुक्त वाटली, तिच्या सहाय्याने शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यातून ज्ञानेश्वर यांनी 24 बाय 24 मीटरचे शेततळे बांधले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमधून शेततळ्यासाठी त्यांना एक लाख 67 हजार रुपये अनुदान मिळाले आहे. आणि शेततळ्यात मत्स्य पालन करण्यासाठी 36 हजार रुपये मिळाले आहे.
आपल्या अनुभवाबाबत भोकरे यांनी सांगितले की , “मत्स्य पालन हा व्यवसाय माझ्यासाठी नवीनच आहे. मी मत्स्यबीज पश्चिम बंगाल मधून आणले आहे. माझ्याकडे पंकज (पंगेशिअस) हे मासे आहेत. मी फिंगर लाईन म्हणजेच बोटुकली साइज शेततळ्यामध्ये स्टॉकिंग केले होते. जानेवारी महिन्यात तळ्यात एक हजार मत्सबीज टाकले होते सहा महिन्यात त्यांची वाढ होऊन आता प्रत्यक्ष मासे विक्रीला सुरुवात केली आहे. माशांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी वेळच्यावेळी त्यांना खाद्य देणे आणि पाण्याची नियमित तपासणी आवश्यक आहे. पाण्याची क्वालिटी खराब झाल्यास पाणी बदलावे लागते माश्यांसाठी खाद्य एबिज कंपनीचे वापरले आहे. शास्त्र शुद्ध पद्धतीने मत्स्य पालन व्यवसाय केल्यास त्यातून भरघोस उत्पन्न मिळवणे शक्य असल्याचे”, भोकरे यांनी सांगितले.
शेततळ्यातील माश्याना पान कोंबड्यांचा होणारा उपद्रव रोखण्यासाठी भोकरे यांनी तळ्याच्या वरून बर्ड नेट बसवलेली आहे. पाण्याचा पीएच (सामु) आणि अमोनिया टेस्टिंगसाठी त्यांनी टेस्टिंग किट घेतलेली असून ऑक्सिजनेशन साठी एरीएटर बसवलेले आहे.
गावाच्या रस्त्यावर भोकरे यांनी छोटेखानी स्वरुपात विकेल ते पिकेल उपक्रमांतर्गत मासे विक्री करण्यास सुरुवात केली असून याठिकाणी प्रत्येक दिवशी 15-20 किलो मासे विक्री होतात. सरासरी 150 रु. किलो.प्रमाणे 2500 किलोचे 3 लक्ष 75000 हजार पैसे मिळाले आहे. यामध्ये खाद्य आणि वाहतू खर्च 1 लक्ष 25000 खर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न 25 हजार पर्यंत मिळेल.
बदलत्या नैसर्गिक वातावरणात, पावसाच्या अनियमितपणाच्या आताच्या काळात पारंपरिक पद्धतीने शेती करणे अनेक कारणांमुळे अवघड होते आहे. त्यात मत्सपालनाचा हा जोड व्यवसाय आमच्या सारख्या लहान शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक आधार देणारा आहे, अशा भावना ज्ञानेश्वर यांनी व्यक्त केल्या.
शब्दाकंन :- वंदना थोरात ( माहिती अधिकारी )