खरिप कर्ज वितरण उद्दिष्ट तत्काळ पूर्ण करा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
औरंगाबाद,२ जुलै /प्रतिनिधी :- सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ सुरु आहे. कापूस, सोयाबीन,मका आदी पिके शेतकरी घेत आहेत. त्यांना आवश्यक असणारे खरीप पिकाचे कर्ज बँकांनी शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन तत्काळ मंजूर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप पीक कर्ज वितरण आढावा बैठक श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा उपनिंबधक अनिलकुमार दाबशेडे, व सर्व बँकाचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळया बँकांकडे खरीप पीक कर्ज प्रस्ताव दाखल केलेले आहेत. जिल्हयातील बँकांनी त्या प्रस्तावास तत्काळ मान्याता द्यावी. शिवाय सर्व बँकांनी बैठकीस येताना परिपूर्ण माहितीसह उपस्थित राहण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शासनाच्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनांचाही शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत श्री.दाबशेडे यांनी उपस्थित बँकांनी पूर्ण केलेल्या सध्याच्या उद्दिष्टांबाबत माहिती सादर करुन बँकांनी तत्काळ उद्दिष्ट पूर्ण करावे, असे सांगितले.
बैठकीस युनियन बॅंक ऑफ इंडिया, इंडियन बॅंक, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, आयडीबीआय, कर्नाटक, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल, जिल्हा मध्यवर्ती , अग्रणी, बडोदा, महाराष्ट्र आदी बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.