उपासमारीच्या समूळ उच्चाटनासाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग गरजेचा – अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती

१५ वा ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ मुंबईत साजरा

मुंबई, दि. 29 : उपासमारीच्या समूळ उच्चाटनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून त्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त देबाशिष चक्रवर्ती यांनी केले.

विश्वविख्यात थोर संख्याशास्त्रज्ञ प्रा. प्रशांतचंद्र महालनोबीस यांनी आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पद्धतीचा विकास यामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन 29 जून हा दिवस केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सन 2007 पासून दरवर्षी संपूर्ण देशभर ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार यावर्षी अर्थ व सांख्यिकी संचालनालय येथे 15 वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त देबाशिष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रशासन भवन येथे साजरा करण्यात आला.

नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त श्री.चक्रवर्ती म्हणाले, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने ‘शाश्वत विकास ध्येय क्र. 2 उपासमारीचे समूळ उच्चाटन, उपासमारी नष्ट करणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषण आहार साध्य करणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे’ ही या यावर्षीची थिम आहे. या माध्यमातून विभागाच्या वतीने 17 ध्येय निश्चित करण्यात आले असून ही ध्येय साध्य करण्यासाठी 2030 हे वर्ष निश्चित करण्यात आले आहे. ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन या मोहिमेत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.चक्रवर्ती यांनी केले.

श्री.चक्रवर्ती म्हणाले, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने “शाश्वत विकास ध्येय क्र. 2 याबाबत काही सूचना असतील तर कळविण्यात याव्यात. संचालनालयाच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

या कार्यक्रमाला महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन,  कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाच्या उप सचिव प्रज्ञा महाले, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक र. र. शिंगे, अपर संचालक (समन्वय) विजय आहेर, जी.व.चौधरी यांच्यासह दूरदृष्य प्रणालीद्वारे विविध जिल्ह्यांमधुन जिल्हा सांख्यिकी अधिकारी, सह संचालक तसेच संचालनालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कृषी विभागाचे सचिव श्री. डवले म्हणाले, महाराष्ट्रातील शेती पावसावर अवलंबून असून पावसाची अनियमितता आणि पर्यावरणातील बदलामुळे शेती उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होतो. कृषी क्षेत्रातील योजनेचे मॅपिंग करण्यात येऊन त्यामध्ये वस्तुनिष्ठतेसाठी प्रयत्न केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव  श्रीमती कुंदन म्हणाल्या, सर्व प्रकारचे कुपोषण नष्ट करणे हे या वर्षीचे उद्दिष्ट आहे. सांख्यिकी विभागाकडून जो डेटा मिळाला आहे त्याचा चांगला अभ्यास करुन विभागाला याचा निश्चित फायदा होईल. बालकांचे व गर्भवती महिलांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच बालवाडी व अंगणवाडी यांच्यामधील ग्रामीण शहरी भागातील कार्यक्रम नियोजन करुन तो शेवटच्या घटकापर्यंत कशा प्रकारे पोहोचेल यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्याकरिता सिस्टीम आणि स्ट्रक्चरमध्ये बदल घडवून आणुन त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. जि. व. चौधरी, अपर संचालक (मुल्यमापन) यांनी शाश्वत विकास ध्येय क्र.2 उपासमारीचे समूळ उच्चाटन, उपासमारी नष्ट करणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषण आहार साध्य करणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे या विषयावर सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली.

सांख्यिकी दिनाचे औचित्य साधुन सांख्यिकी संचालनालयाची “Report on collection of farm activities data and other related study, State Domestic Product, District Domestic Product, महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी 2020 व महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी 2018 यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.